सोलापूर : ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली.
ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केलं नाही, असा आरोपही पडळकरांनी केला. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो. ‘राज्यात महाविकास आघाडी हे तीन पायाचे सरकार आल्यापासून समाजा-समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.
‘धोक्यानं जे सरकार आलं, त्या सरकारमध्ये ओबीसी का उपमुख्यमंत्री झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत? हे ओबीसी का समोर आले नाहीत? सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असा हल्लाबोल पडळकरांनी केला. ‘ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे,’ असा दावाही त्यांनी केला.