पालघर – योगेश चांदेकर
डहाणू: शिक्षक सेवा शर्तीच्या नियमांसह ‘आरएनआय’चे नियम पायदळी तुडवत डिजिटल दैनिक चालविणारे संपादक शिक्षक शाहू भारती यांच्यावर आता प्रशासनाकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. डहाणू पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसच्या अनुषंगाने दिलेला खुलासा संयुक्तिक नसल्याचा ठपका शिक्षण विभागाने ठेवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता चार सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, ही समिती प्रत्यक्ष ‘झाडाझडती’ घेणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकपदी कार्यरत असतानाही शाहू भारती जवळपास चार वर्षांपासून अनधिकृतरित्या ‘रयतेचा कैवारी’ हे डिजिटल दैनिक चालवत असल्याचे वृत्त डिजिटल दैनिक ‘लक्ष्यवेधी’ने प्रकाशित केल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी भारती यांना तातडीने खुलासा मागविला होता. त्यावर ‘शाहू भारती’ यांनी आपण या दैनिकासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे खलाशात नमूद केले होते. मात्र, शाहू भारती यांनी दिवाळी विशेषांकासाठी प्रकाशित केलेले जाहिरात दरपत्रक तसेच वर्धापन दिनानिमित्त प्रकाशित केलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून शाहू भारती व्यवसायही करत असल्याचे समोर आले आहे. ही बाब दडवून ठेवत शाहू भारती यांनी दिलेल्या खुलाशाद्वारे शासनाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाहू भारती यांनी नियमांची पायमल्ली करतानाच शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. शाहू भारती यांनी शासनाची नियमांचे उल्लंघन करतानाच खुलासा देतानाही प्रशासनाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत.
दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीमध्ये दोन शिक्षण विस्तार अधिकारी आणि दोन केंद्र प्रमुखांचा समावेश आहे. ही समिती शाहू भारती यांची प्रत्यक्ष चौकशी करणार असून, अहवाल सादर करणार आहे.
आधी होते ‘वाली’, नंतर बनले ‘कैवारी”
कोणतेही दैनिक, साप्ताहिक किंवा अन्य प्रकाशन सुरू करण्यासाठी ‘आरएनआय’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, शाहू भारती यांनी दैनिकासाठी अशी नोंदणीच केली नाही. दुसरे म्हणजे प्रस्ताव पाठविल्यानंतर ‘आयएनआय’ने स्वीकृती दिलेल्या नावानेच प्रकाशन सुरू करावे लागते. संबंधित नाव आपल्या इच्छेप्रमाणे बदलता येत नाही. असे असतानाही दैनिकाचे नाव सुरुवातीला ‘रयतेचा वाली’ असे ठेवले. नंतर मात्र हे नाव बदलून त्यांनी ‘रयतेचा कैवारी’ असे केले. अशाप्रकारे भारती यांनी ‘आयएनआय’ चे नियम डावलल्यामुळे ज्ञान देणारे गुरुजी एवढे कसे ‘अज्ञानी’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संपादक गुरुजींचे दैनिक शैक्षणिक नव्हे व्यावसायिक!
शाहू भारती यांनी आपले दैनिक शैक्षणिक असून कोणताही आर्थिक व्यवहार करत नाही, असे सोशल मीडियाद्वारे जाहीर केले होते. मात्र, प्रकाशित केलेले जाहिरात दरपत्रक आणि जाहिरातींमुळे त्यांचे दैनिक व्यावसायिक असल्याचे उघड झाले आहे.