विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
अमरावती (दि. १२ जून २०२१) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग हा फक्त मोझरी परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण वाटचाल करू. महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल, असा मानस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विदर्भाच्या दौऱ्यात आपण कष्टकरी, कामकरी, शेतकरी, गरिबांच्या व्यथा पाहिल्या आहेत. कोरोनामुळे या लोकांचे जगणे अवघड झाले आहे. एकीकडे कोरोनाशी सामना तर दुसरीकडे जगण्याची धडपड सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर या औषधांचा पुरवठा केंद्र सरकार करते तो वेळेवर व पुरेसा न केल्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले. आताही बुरशी आजारावरचे इंजेक्शन केंद्राकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेतकरी सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत पण पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांशी बोलावयास वेळ नाही. भाजपचे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन गेले आहे. काँग्रेसचा विचारच या देशाला वाचवू शकतो, संविधानाला वाचवू शकतो असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालक मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.