पालघर-योगेश चांदेकर
आठवड्याच्या जनता दरबारात नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक
सामान्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचे व्रत
पालघरः राजकीय पक्ष निवडणुकीपुरते सक्रिय असतात आणि त्यांचे कार्यकर्तेही निवडणुकीच्या काळातच फक्त सामान्यांना भेटतात, असा एक मतप्रवाह असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो खरा असल्याची प्रचिती येते; परंतु शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्रजी गावित यांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याकरता प्रत्येक गुरुवारी होणाऱ्या जनसंवाद मोहिमेची राजयोग मॉल पालघर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात सुरुवात झाली. याप्रसंगी आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमदार राजेंद्र गावीत यांनी केला. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही सामान्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी २४ तास उघडे राहील, असे कार्यालय सुरू केले आहे. महाराष्ट्रात २४ तास सुरू असणारे हे एकमेव कार्यालय असावे, असा अंदाज आहे. या कार्यालयात आलेला कोणीही विन्मुख होऊन कधीच परत जात नाही. आपल्या तक्रारीचे निवारण होते, ही समाधानाची भावना घेऊनच तो बाहेर जातो.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचा प्रभाव आहे. शिवसेना ज्या उद्देशाने स्थापन झाली, तो उद्देश विसरला गेला होता. काम मध्यंतरीच्या काळात बंद पडले होते. शिवसेनेच्या शाखा हा सामान्यांना न्याय मिळण्याचा एक वेगळा पर्याय होता; परंतु मधल्या काळात शिवसेना ज्या कारणाने स्थापन झाली, त्या समाजकारणाचा काहीसा विसर पडला होता; परंतु शिंदे यांच्याकडे सत्ता आल्यानंतर तसेच संखे यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या मूळ कामाला प्राधान्य दिले आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून कार्यालयाला कुलूप नाही
शिवसेनेच्या शाखा या सामान्यांना न्याय देणाऱ्या, सामान्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या असत. हाच उपक्रम विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून संखे यांनी सुरू केला आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचे कार्यालय सामान्यांना न्याय देणारे असावे, या हेतूने त्याची रचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी ज्या दिवशी ज्या दिवशी शपथ ग्रहण केली, त्या दिवसापासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचे कार्यालय २४ तास सुरू असते. एक क्षणही हे कार्यालय बंद झाले नाही.
व्यक्तीगतसह सर्व प्रश्नांची सोडवणूक
या कार्यालयात कोणीही व्यक्तिगत, सार्वजनिक किंवा अन्य प्रश्न घेऊन आले, तरी त्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम या कार्यालयातून चालते. या कार्यालयात सर्व शासकीय विभागाच्या कामासाठी लागणारे अर्ज, फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांना कोणत्या योजनांचा कुठे, कसा आणि केव्हा फायदा मिळू शकेल याचे मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
दर आठवड्याला जनता दरबार
दर शुक्रवारी संखे जनता दरबार घेतात. या जनता दरबारात नागरिकांनी त्यांची कोणतीही तक्रार आणली, तर त्या तक्रारीवर योग्य ते समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. व्यक्तिगत प्रश्न, सामाजिक प्रश्न, सरकारी नोकरी, सरकार दरबारात प्रलंबित असलेले काम आदी संबंधी काही तक्रारी असतील, तर त्यावर लगेच पत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पत्र केवळ औपचारिकता म्हणून दिले जात नाही, तर संबंधितांच्या कामाचे पुढे काय झाले आणि आपल्या पत्राची सरकार दरबारी काय दखल घेतली गेली याचा पाठपुरावाही केला जातो. राज्यात एखाद्या जिल्हाप्रमुखांनी आठवड्यातून एकदा दरबार भरवून, त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन, त्यावर मार्ग काढण्याचा हा अपवादात्मक प्रयत्न म्हणावा लागेल. केवळ पत्र देण्यावर समाधान मानले जात नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईल, दूरध्वनीद्वारे संपर्क साधून हे काम नेमके कोठे अडले आहे, त्यात अडचणी काय आहे त्यातून कसा मार्ग काढता येईल, याबाबत चर्चा करून संबंधिताचा प्रश्न निकाली काढण्याबाबत उपाययोजना केली जाते.
खिशाला तोशीस सोडून मदत करणारा नेता
कुंदन संखे पूर्वीपासूनच नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जात असतात. कुणाचे निधन झाले, कुणाच्या शैक्षणिक प्रवेशाला पैसे कमी पडले, कोणाला अन्य काही अडचणी आल्या, तर खिशाला तोशीस सोसून ते मदत करत असतात. बाळासाहेबांनी शिवसेनेत शिवसैनिकांबाबत जी अपेक्षा व्यक्त केली होती, त्या अपेक्षेला संखे पुरेपूर उतरले आहेत.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे व आनंद दिघे यांनी समाजकार्याची जी घडी घालून दिली आहे, त्यानुसार आपण काम करत आहोत. लोकांना कोणत्याही स्वरूपाची काहीही तक्रार असली तरी ते केव्हाही आमच्या कार्यालयात संपर्क करू शकतात. येथे आलेल्या प्रत्येकाचे समाधान करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम केवळ निवडणुकीपुरतेच नसते, तर हे काम अहोरात्र करायचे असते. कार्यकर्त्यांची, नेत्यांची जनतेशी नाळ कायम जुळलेली असली पाहिजे, या भावनेतून आपण काम करतो.
कुंदन संखे, शिवसेना जिल्हाप्रमुख, शिंदे गट