पालघर- योगेश चांदेकर
ज्येष्ठ विचारवंत, सुप्रसिध्द लेखक विल्यम शेक्सपियर यांनी असे म्हटले आहे, की हजार शब्दापेक्षा एक हसरा चेहरा जास्त शक्तीशाली असतो. तद्वत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहराही नेहमीच स्मित हास्यदायी आहे. त्यांचे हे हास्य आम्हा सर्व तरुणांना नेहमीच कार्यचेतना देते. राज्यापुढे कितीही संकटे असली, कितीही संघर्षाची परिस्थिती आली तरी ते स्वतः त्याचा लवलेशही आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही. परिस्थितीला हाताळणं, संकटाला, संघर्षाला धीरोदात्तपणे सामोरे जाणं ही कला त्यांना आत्मसात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून ते आजतागायत ११ वर्षांत भारताला जागतिक महासत्तेकडे घेवून जाण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीतही भारताला सर्वश्रेष्ठ सिद्ध करून बदलत्या आव्हानांना सामोरे गेले आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही बिरुदावली तेव्हापासून रूढ झाली असून महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीत भर घालणारे कार्यकुशल नेतृत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. आई-वडीलांचे संस्कार मुलांना प्रत्येक आघाडीत यश मिळविण्यांसाठी उपयोगी ठरत असतात. वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यावर पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेची छाप पडली. जनसंघात शिस्तीला विशेष महत्व. हा शिस्तीचा नियम त्यांनी आपल्या कुटुंबातही लावला आणि त्यातून देवेंद्र यांच्यावरही जनसंघ विचाराचा ठसा उमटला. कठीण परिस्थितीत स्वतः बरोबर घराला, परिसराला, तालुक्याला, जिल्हयाला, राज्याला कसे सावरायचे याचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. व्यक्तीपेक्षा संघटन, संघाची विचारधारा, संस्कार महत्वाचे याची शिकवण त्यांना मिळाली. कितीही आणीबाणीची परिस्थिती ओढवली, तरी पक्षहित जपायचं याचा घडाही अनेकांना त्यांच्याकडून मिळाला आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. पितृछायेची ऊब त्यांना फार काळ मिळाली नाही; मात्र कृतीशिल विचारांचा वारसा मिळाला तर मनुष्य निश्चित पुढे जाऊ शकतो हे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. १९८९ मध्ये त्यांनी सर्वप्रथम समाजकारणांत पाऊल ठेवले, ते नागपूर भाजप युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून. प्रभागातील गोर-गरीब, दीन दलित, उपेक्षित, दिव्यांग, माता-महिला-भगिनी, अबाल-वृध्द, ज्येष्ठ श्रेष्ठ, वंचित आदी घटकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना केल्या, म्हणूनच त्यांना वयाच्या बावीसाव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि त्यातून महापौरपदावर काम करण्यांची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोने करून दाखविले. एक युवक देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देवू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांनी इतरांना घालून दिले. राजकरणांत युवा शक्तीला विशेष महत्त्व आहे. जगामध्ये भारतीय युवाशक्तीचा सध्या जयजयकार आहे. बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाने प्रत्येकाला जवळ-जवळ आणले आहे. ‘ग्लोबलायजेशन’ ही संधी मानून त्यानुरूप सुसंगत ध्येय धोरणांची आखणी करण्यात फडणवीस यशस्वी ठरले आहेत. राज्याचा गाडा ओढण्यांत त्यांचे नेतृत्व सक्षम आहे.

देवेंद्र १९९४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. पुढे २००१ मध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. २०१० मध्ये सरचिटणीस, २०१३ मध्ये प्रदेशाध्यक्ष या सगळ्या संधी त्यांच्या पायापाशी चालून आल्या आणि त्यातून त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. नेतृत्व सक्षम असेल, तर कर्तृत्वही आपोआपच मोठे होत असते. नागपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर समाजकारण, राजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली आहे. राज्याच्या पटलावर वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे ते दुसरे सर्वात तरुण नेते आहे. ही जागा सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नसते, तर त्यासाठी पात्रताही असावी लागते. अर्थातच ती पात्रता देवेंद्र यांच्या ठायी होती, म्हणूनच ते या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. देवेंद्र यांनी राज्याच्या विकासात भर घालणारी एक टीम तयार केली. त्यांच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मंत्रिमंडळातील अन्य सर्व सहयोगी मंत्र्यांना त्यांनी एकसंघ ठेवत उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी कोण कोणत्या मूलभूत पायाभूत सोयी सुविधा निर्माण करायच्या याची शिकवण देत पुढे नेले. विकासाचा मास्टरप्लॅन तयार करत त्या सर्व कामांची आखणी केली. महाराष्ट्राला आजवर अनेक थोर, कर्तृत्वसंपन्न मुख्यमंत्री लाभलेले आहेत. त्यात स्व. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचे कार्य मोठे आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कृषी-औद्योगिक विकासाचा पाया घातला आणि सहकार चळवळीतून तमाम महाराष्ट्रवासीयांच्या प्रगतीत भर घातली. पुढे साध्या माणसांचा साधा प्रतिनिधी म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव निघते. जेमतेम शिक्षण असलेल्या या प्रतीभावान व्यक्तीमत्वाने राज्याचे नाव देशात उज्ज्वल करून दाखविले. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या अतिशय योजनेतून त्यांनी राज्याला दिशा दिली. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. बाभळगावचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास असलेले प्रतिभावान विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यभरारीतून महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा वाढवत दिल्लीच्या तख्तावर त्याचे नाव उज्वल केले. अगदी असेच काहीसे देवेंद्र यांच्याबाबतीत आहे, त्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांची चुणूक जगाला दाखवून दिली. राज्याचा दुष्काळ कायमचा कमी करण्यासाठी व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली आणि ती यशस्वी करून दाखविली. परिणामी असंख्य ठिकाणची जिरायती जमीन कमी खर्चात ओलिताखाली आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे देवेंद्र यांची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर आणखीच उजळून निघाली आहे.
देवेंद्र यांनी गृह खात्यावर बारकाईने लक्ष ठेवत त्याला आगळी वेगळी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळ स्तरावर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अंदाज समिती, नगरविकास, गृहनिर्माण, स्थायी समिती, नियम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राखीव निधी, विषय संयुक्त निवड समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, स्वयंनिधीवर आधारीत शाळाबदल, संयुक्त निवड समिती अशा एक ना अनेक समित्यांवर त्यांनी काम करत आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. कायद्याचे शिक्षण आत्मसात केल्यानंतर त्यांनी परदेशातील बर्लिन येथील ‘फ्री युनिर्व्हसिटी’मध्ये डी.एस.ई. डिप्लोमा उत्तीर्ण करत प्रकल्प व्यवस्थापन तंत्राबाबतचे शिक्षण पूर्ण केले. अमेरिकन सरकारच्या ‘ईस्ट वेस्ट सेंटर’तर्फे न्यू जनरेशन सेमिनार आयोजित करण्यात आले होते. त्यात त्यांना एनर्जी सिक्युरिटी इश्यू या विषयावर शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, सिंगापूर, केनिया, नैरोबी, चीन, डेन्मार्क, कोपेनहेगन, मलेशिया, युरोप, रशिया, स्वित्झर्लंड, अनेक अनेक देशांचा दौरा करत तिथून महाराष्ट्र राज्याची औद्योगिक प्रकल्प आणण्याचे काम केले. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. या नेतृत्वाचे ‘महाराष्ट्र व्हीजन’ खरोखरच मोठे आहे. रस्ते या विकासाच्या मुख्य धमन्या आहे, हे ओळखून त्यांनी महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या साथीने अनेक नवनवीन रस्ते तयार केले. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग हा युती शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण करत त्याचे लोकार्पण केले. आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्रवासीयांसाठी मोठे काम केले. विधिमंडळात नवनवीन नेतृत्व पुढे येत आहे. त्यांच्यासाठी सोप्या भाषेतील अर्थसंकल्प या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले. त्यामुळे किचकट अर्थसंकल्प अनेक आमदारांना सोपा वाटू लागला आहे. ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र’ यासह अन्य दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. हजरजबाबी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्र राज्याने अनुभवली आहे. ‘कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन’तर्फे त्यांना अलिकडेच सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळालेला आहे. देवेंद्र यांच्यात एक अभिनेताही दडलेला आहे. कला मनुष्याच्या नेतृत्वगुणाला पुढे नेत असते. राजकारणात येण्याअगोदर त्यांनी मॉडेलिंग चेहरा म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. हिरा हा कितीही अंधारात ठेवला तरी तो चकाकतो. देवेंद्र यांना सर्वस्पर्शी ज्ञान आहे.

















