राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे, याचदरम्यान गुरुवारी विधानसभा लॉबीमध्ये जोरदार राडा झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गोपिचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले
यामुळे चांगलाच गोंधळ उडाला असून, आरोप-प्रत्यारोपानं राजकारण तापलं आहे. या प्रकरणाची आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर
ज्यांनी राडा घातला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना व अनधिकृतपणे हे अभ्यांगत सदस्यांसोबत आले. हे आक्षेपार्ह कृत्य आहे. विधानभवन सभागृहात असे कधीही झाले नाही. मुळात त्या अभ्यांगतांना आत आणायची काहीही गरज नव्हती. असे अभ्यांगत आले तर त्यांची जबाबदारी संबंधित आमदारांची असते. या अप्रिय घटनेनंतर मी सर्व आमदारांना सांगत आहे, विधीमंडळाची परंपरा जपण्याचे उत्तरदायित्त्व हे आमदारांचे आहे.
आमदारांचे वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा उंचावणारे असावे, अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच काही नियम पाळणे गरजेचे आहे. म्हणूनच लोकसभेच्या धर्तीवर नितीमूल्य समिती गठीत केली जाईल, याबाबतचा निर्णय एका आठवड्यात घेतला जाईल. लोकसभेत यापूर्वी खासदारांचे निलंबनच नव्हे तर सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी या समितीचे गांभीर्य घ्यावे, असा इशारा यावेळी नार्वेकर यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांत आमदारांचे वर्तन हे चिंतेची बाब आहे, आमदारकीची शपथ घेताना आपण संविधानाबाबत जे बोलतो ते गांभीर्याने पालन करण्याची गरज आहे. म्हणून यापुढे फक्त आमदार व त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश दिला जाईल. बहुतेक वेळा मंत्री विधीमंडळात बैठक घेतात, पण आता मंत्र्यांनीही त्यांच्या बैठका मंत्रालयात घेण्याच्या सूचना देत आहे. अपवादात्मक परिस्थितीत बैठक घेतली, तर अभ्यांगतांना प्रवेश दिला जाणार नाही, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दोन्ही ही अभ्यांगतांनी केलेले वर्तन हे विधीमंडळाची प्रतिमा मलीन करणारे आहे,
म्हणून विधानसभा विशेषाधिकार समितीकडे मी दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे.
त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करत आहे, पडळकर व आव्हाड यांनी दोन्ही अभ्यागतांना विधीमंडळात आणले. त्यामुळे दोघांनी सभागृहात खेद व्यक्त करावा. तसेच पुढे अशी घटना घडणार नाही, असे आश्वस्त करावे, असंही यावेळी नार्वेकर यांनी म्हटलं.