पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केलेल्या व्यूहरचनेमुळे अस्वस्थ झालेल्या महायुतीतील तसेच महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येऊन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावर राजपूत यांनी मात केली. भाजपला जिल्ह्यात अन्यत्र विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना त्यांचा मात्र पराभव झाला. भाजपच्या दृष्टीने गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून राजपूत यांनी भाजपसाठी जिवाचे रान केले. प्रयत्नांची पराकाष्टा केली. शिवसेनेच्या ताब्यातील पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणला आणि सर्वांचे मनोमिलन करून महायुतीच्या बळावर भाजपला पावणेदोन लाख मतांनी विजय मिळवून दिला. भाजपची संघटनात्मक बांधणी केली.
दोन वेळच्या अध्यक्षपदाचा संघटनात्मक बांधणीसाठी उपयोग
राजपूत यांना मिळालेल्या दोन अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा त्यांनी चांगला वापर करून घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या असलेल्या संपर्काचा वापर त्यांनी करून घेतला. सातत्याने स्वतःपेक्षा पक्षाचाच विचार त्यांनी केला. भाजपचे अहोरात्र सुरू असलेले कार्यालय आणि त्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना चालना देण्याचे काम त्यांनी केले. त्यातच विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही त्यांनी पालघर जिल्ह्यात भाजपला अधिक जागा पदरात पाडून घेऊन डहाणूची एकमेव जागा वगळता उर्वरित तीन जागा जिंकल्या. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागाही निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
कार्यकर्त्यांची मोहळ केली जमा
राजपूत यांच्या संघटनात्मक चातुर्याची दखल घेऊन भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस तसेच डाव्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेतले. जिल्हा परिषद, नगरपालिका महानगरपालिका, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत अधिकाधिक यश कसे मिळवता येईल, याची आखणी त्यांनी केली. भाजप पक्षांतर्गत गटबाजी होती; परंतु ही गटबाजी बाजूला ठेवून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यात लढाऊ वृत्ती निर्माण केली. लोकसभेपासून त्यांनी वेळोवेळी जे अंदाज व्यक्त केले, ते प्रत्यक्षात खरे ठरत गेले.
दोन नगराध्यक्षपदे आणि जादा नगरसेवकपदे
पालघर जिल्ह्यातील चारही नगरपालिकांच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे महायुतीतील घटक पक्ष अस्वस्थ झाले. महाविकास आघाडी पालघर जिल्ह्यात तशी फार प्रभावी नव्हतीच; परंतु राजपूत आणि भाजपचे वाढत असलेले बळ विचारात घेतले, तर विरोधक आणि महायुतीतील घटक पक्षांनाही आपण एकत्र आले नाही, तर आपले काही खरे नाही, भाजपच सर्व यश पदरात पाडून घेईल, असे वाटले. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी तसेच विरोधकांनीही राजपूत यांची कोंडी करण्याचे ठरवले. त्यानुसार सर्वांनी डहाणूत ठाण मांडले. एवढे करूनही भाजपला वाडा, जव्हार या दोन ठिकाणचे नगराध्यक्ष तसेच पन्नास नगरसेवक निवडून आणता आले.
राजपूत यांचे यश खुपल्याने कोंडी
डहाणूच्या नगराध्यक्षपदासाठी राजपूत रिंगणात असल्यामुळे त्यांना अडकवून ठेवायचे म्हणजे मग अन्यत्र आपल्याला चांगले यश मिळेल, अशी व्यूहरचना महायुतीतील अन्य पक्ष व विरोधकांनी केली. राजपूत यांचे हे यश अनेकांना खुपणारे होते, म्हणून त्यांचे विजयी होणे पुढच्या काळात आपल्याला काहीच हाती लागू न देण्यासारखे आहे, असे वाटल्याने सर्वच राजकीय पक्ष भाजप विरोधात एकवटले. प्रचार सभांमध्ये राजपूत यांना थेट रावणाची उपमा दिली आणि लंका दहन करण्याची भाषा वापरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास डहाणूला येऊन तिथे सभा घ्यावी लागली. यावरून राजपूत यांची दखल राज्य पातळीवर कशी घेतली गेली, हे स्पष्ट होते. असे असतानाही राजपूत यांनी केलेल्या व्यूहरचनेमुळे पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू,जव्हार आणि वाडा या चार नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. ९४ जागांपैकी तब्बल पन्नास जागा जिंकून भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला.
कुणाला किती जागा?
या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेला २६, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा मिळाल्या, तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. पालघर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत असून जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलत असल्याचे हे लक्षण आहे. डहाणूच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजपूत यांचा पराभव झाला असला, तरीही डहाणूच्या २५ जागांपैकी तब्बल १७ जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले, यावरून डहाणूतील त्यांचे संघटनात्मक ताकदही दिसली. एका व्यक्तीविरुद्ध सारेच एक होतात, तेव्हा त्या व्यक्तीची राजकीय ताकद किती आहे, हे सिद्ध झाले आहे. एका पराभवाने राजकीय आयुष्य संपत नसते, तर पराभवातून धडा घेऊन पुन्हा मोठी झेप घ्यायची असते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वी पालघर जिल्ह्यातील १६० जागा मिळवू असा जो विश्वास व्यक्त केला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी ते आता कामाला लागले आहेत.
कोट
‘पराभवातून शिकून अधिक जबाबदारीने पुढे जाणे, हीच लोकशाहीची खरी भावना आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डहाणूच्या विकासासाठी पुढील वाटचाल ठामपणे सुरू राहील.
भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष, भाजप, पालघर

















