मुंबई : ‘औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ (Dharashiva) करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार… परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !’ औरंगाबाद-उस्मानाबादचे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ (Chhatrapati Sambhajinagar) उस्मानाबादचे ‘धाराशिव’(Dharashiva) असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. यावर आज निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी या दोन्ही शहराच्या नामांतराची घोषणा केली होती. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आणि संभाजीनगरच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, केंद्र सरकारने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावाने मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू होते. हिंदुत्ववादी संघटनांकडून नामांतराची मागणी केली जात होती. आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.