‘कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत, काही एक पद्धती आहे. हा निर्णयही सरकार उचित वेळी घेईल. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरविणार नाही,’ अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय योग्यवेळी घेणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात पाऊस सुरू असून पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. धरणांमधून पाण्याचा कधी विसर्ग सुरू करायचा, कधी बंद करायचा, याबाबत पूर्ण नियोजन करण्यात आले आहेत. बाजूच्या राज्यांशीदेखील समन्वय ठेवण्यात आला आहे. शेजारील राज्यांत महाराष्ट्राचा अभियंता नेमण्यात आला असून, त्यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. निसर्गाचा भरवसा देता येत नाही. मात्र, नियोजन करण्यात आले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘विठूरायाकडे आनंद साजरा करीत आषाढी वारीत आपण जात असतो. त्यामुळे असे प्रकार घडू नयेत, याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. संबंधितांशी चर्चा करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठात लवकरच भरती
जगातील पहिल्या ६०० विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश झाला आहे. पुढील वर्षी किंवा दोन वर्षांत पहिल्या पाचशे विद्यापीठांत आपली विद्यापीठे असतील. जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांना मान असतो. त्या दिशेने पुणे विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व मान्यता दिल्या असून, लवकरच प्राध्यापक, विद्यापीठातील विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.