पालघर-योगेश चांदेकर
भरत राजपूत यांची पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार
मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
पालघरः भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे अनेक सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनेक प्रश्न ते मांडत असतात. आता उपप्रदेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांच्या होणाऱ्या अडवणुकीबाबत त्यांनी थेट पालकमंत्री गणेश नाईक यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.
भरत राजपूत हे खासदार डॉ. हेमंत सवरा. आमदार हरिश्चंद्र भोये, स्नेहा दुबे-पंडित, यांच्यासोबत जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करीत असतात. आमदार-खासदारांशी त्यांचा चांगला समन्वय असतो. जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याबरोबरच, प्रश्न सुटत नसतील, तर ते कोणत्या पातळीवर प्रलंबित आहेत, याचा पाठपुरावाही ते करीत आहेत. भाजपच्या जिल्हा कार्यालयातून संबंधितांची थेट संपर्क साधून अगदी मंत्रालय स्तरापर्यंत प्रश्नांची सोडवणूक ते करीत असतात.
अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार
खासदार आणि आमदार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रश्न मार्गी लावत असतात. त्याबाबत पत्रव्यवहार करत असतात; परंतु जिल्हाध्यक्ष म्हणून राजपूतही आपली जबाबदारी पार पाडायला विसरत नाहीत. कोणत्याही प्रश्नाची आमदार, खासदार किंवा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवणूक होते. कधी कधी अधिकाऱ्यांनाशी पत्रव्यवहार करायचा. अधिकारी जुमानत नसेल, तर थेट मंत्र्यांकडून त्यांना समज द्यायची, याबाबत नेहमी पत्रव्यहाराच्या माध्यमातून प्रश्न भरत राजपूत सोडवत आहेत त्यांच्या कार्याबाबतची माहिती आता सर्वदूर झाली आहे. नागरिकही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येत असतात.
सामान्य नागरिकांची अडवणूक
गेल्या काही दिवसापासून पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाक्यावर उभे राहून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी सामान्य वाहन चालकांची अडवणूक करीत आहेत. त्यांना कायद्याचा धाक दाखवतात. प्रसंगी वसुली केली जाते. या अवैध वसुलीसाठी वाहने रस्त्याच्या कडेला थांबवली जात असून त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन सामान्य नागरिकांना आणखी त्रास होतो. या अवैध वाहतुकीमुळे राज्य शासनाची प्रतिमा सामान्य नागरिकात खराब होत आहे.
मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या प्रश्नात लक्ष घालण्यास सांगितले, तर त्यांचा मुजोरपणा दिसला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भरत राजपूत यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
कोट
‘गेल्या काही दिवसांपासून पालघरनजीक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून लूट करत असल्याचे दिसते. या प्रकरणी पालकमंत्र्यांना पत्र दिले असून त्यांच्यावर ते निश्चित कारवाई करतील.
भरत राजपूत, पालघर जिल्हाध्यक्ष, भाजप