पालघर-योगेश चांदेकर
६६३ विद्यार्थ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार
पालघरः पालघर जिल्ह्यात विविध आश्रम शाळेत एकाच दिवशी ६६३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय आदिवासी मंत्री जुआल ओरम यांची भेट घेऊन केली. अशा घटना पुन्हा पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असतानाच पालघर जिल्ह्यात पाच तारखेला विविध ३३ आश्रम शाळांमध्ये विषबाधेचे प्रकार घडले. त्यात ६६३ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. या प्रकाराकडे खा. डॉ. सवरा यांनी केंद्रीय आदिवासी विकासमंत्र्यांचे लक्ष वेधले. ३३ आश्रम शाळेतील २९५ मुले आणि ३३८ मुली अन्नातून विषबाधा झाल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची तब्येत ठीक असली, तरी या प्रकरणाकडे खा. सवरा यांनी आदिवासी विकास मंत्री ओरम यांचे लक्ष वेधले.
वैद्यकीय पथकाची चांगली कामगिरी
पालघर जिल्ह्यातील विषबाधेच्या प्रकरणाची माहिती घेऊन त्यांनी ती माहिती आदिवासी विकास मंत्री ओरम यांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी मुलांवर उपचार केल्यामुळे कुणीही दगावले नाही. या प्रकरणाची केंद्रीय पातळीवरून चौकशी करण्याची मागणी ओरम यांच्याकडे यांच्याकडे केली. असे प्रकार अन्यत्र घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी तसेच पालघरची पुनरावृत्ती देशातील कोणत्याही आदिवासी विभागात होऊ नये, याची दखल घेण्याची मागणी डॉ. सवरा यांनी ओरम यांच्याकडे केली आहे.
एकाच ठिकाणाहून अन्नपुरवठा
डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या तालुक्यांत ३३ आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कांबळ गाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण पुरवले जाते. या सर्व विद्यार्थ्यांना चवळीची भाजी आणि एक अंडे, तर संध्याकाळी दुधी आणि डाळीची भाजी जेवणात देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशीही सकाळी जेवण देताना पुन्हा चवळीची भाजी आणि एक अंडे दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. काही वेळेतच त्यांना उलट्या, जुलाब होण्यास सुरुवात झाली.
आदिवासी विभागाकडून भोजन
आश्रमशाळांमधील १५ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता आणि दोन वेळचे तयार जेवण २१ बंदिस्त वाहनांमधून आश्रमशाळांमध्ये पोहोचवले जाते. वर्षभरापूर्वी टाटा ट्रस्टमार्फत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सेंट्रल किचन चालवण्यात येत होते. यंदापासून आदिवासी प्रकल्प विभागार्फत सेंट्रल किचन चालवले जाते. अन्नाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.
स्वच्छतेचा अभाव
सेंट्रल किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव, जेवणाबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्याचे लेखापरीक्षण करून हा ठेका रद्द करण्याबाबत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.