पालघर- योगेश चांदेकर
कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
पालघरः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर स्वबळावर लढवण्यात आल्या. त्यात काहींना काही ठिकाणी यश आले, तर काहींना अपयश आले; परंतु या निवडणुकीने केल्यानंतरही पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावर आता पोलिस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असले, तरी पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र महायुतीतील घटक पक्ष परस्पराविरुद्ध लढले. त्यात डहाणू नगरपालिकेच्या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजपूत हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार होते. त्यांनीच भाजपला स्वबळावर निवडणुकीला तयार केले आणि व्यक्तिगत त्यांचा पराभव वगळता भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या.

आरोप-प्रत्यारोपामुळे ठिणगी
निवडणुकीच्या काळात डहाणू नगरपालिकेच्या कारभारावरून राजपूत आणि डहाणूचे शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. निवडणुकीत भाजपला नगरसेवक पदाच्या १७ जागा मिळाल्या, तर नगराध्यक्षपदी शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी निवडून आले. त्यानंतर महायुतीतील वाद संपून दोघे समन्वयाने कारभार करतील, अशी अपेक्षा होती; परंतु फाटक यांनी राजपूत यांच्यावर केलेल्या आरोपाची प्रतिक्रिया आता भाजपमधून उमटत आहे.
पोलिसांत तक्रार
भाजपचे बोईसर विभागाचे मंडळ अध्यक्ष महेंद्र भोणे, जिल्हा सचिव अंकुर राऊत सरावलीचे सरपंच आनंद धोडी यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बोईसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यात राजपूत यांची बदनामी थांबवली नाही, तर भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करील, असा इशारा देण्यात आला आहे. राजपूत यांनी जिल्हाभर भाजपचे बळ वाढवले. त्यांचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. अशा परिस्थितीत त्यांची बदनामी करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न फाटक हे प्रचार माध्यमातून तसेच गावोगावच्या बैठकातून करीत आहेत. ते लोकांना संभ्रमात टाकत आहे. त्यांची ही कृती बेजबाबदार पणाची असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्यांच्या बदनामीमुळे राजपूत यांच्या कार्यात बाधा येऊ नये, यासाठी फाटक यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला आहे.
पोलिसांच्या कारवाईचे लक्ष्य
आता पोलिस याप्रकरणी कोणती कारवाई करतात याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीच्या घटक पक्षात निर्माण झालेली वादाची दरी अजूनही मिटलेली नाही. महायुतीतील घटक पक्ष राज्यात एकदिलाने कारभार करीत असताना स्थानिक नेत्यांच्या वागणुकीमुळे नेत्यांत दरी निर्माण होत आहे.

















