पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत विवळवेढेचे सरपंच नितेश भोईर यांच्यावर महालक्ष्मी यात्रेच्या दिवशी भ्याड हल्ला करण्यात आला होता त्यात ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सरपंच परिषदेच्या पालघर जिल्ह्यातील सदस्यांनी भोईर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना ७५ हजार पाचशे रुपयांची मदत केली. सरपंचांवरील भ्याड हल्ले रोखण्यासाठी कायदे अधिक कडक करण्याची मागणी सरपंच परिषदेचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष हेमंत संखे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभर गाजले. त्यानंतर सरपंचांनी आंदोलन करून सरपंचांवर होणाऱ्या हल्ल्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतरही राज्यभरात सरपंचांवर हल्ले होत आहेत.

गावगाडा हाकणारेच असुरक्षित
गावगाडा चालवणाऱ्या आणि गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या सरपंचांबाबतची काही ठराविक लोकांची भावना आता बदलली असून त्यांची मजल थेट सरपंचांवर हल्ले करण्यापर्यंत गेली आहे. ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान देणारा सरपंच हा घटकच आता असुरक्षित वातावरणात जगत आहे. विवळवेढे येथील सरपंच नितेश भोईर हे यात्रेच्या नियोजनात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यात्रेच्या दिवशीच झालेल्या या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
हल्ल्यापासून अद्यापही भोईर कोमात
भोईर हे अद्यापही कोमात असून त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथे उच्चार सुरू आहेत. पालघर सरपंच परिषदेचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्याला मदत करण्याचे ठरवले. पालघर तालुक्यातील सरपंचांनी एकत्र येऊन भोईर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याकडे ७५ हजार हजार पाचशे रुपये सुपूर्द केले. याशिवाय त्यांच्या संकटाच्या काळात सर्व सरपंच त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे ठामपणे सांगितले.

भोईर यांच्या कुटुंबीयांना धीर
सरपंच परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष हेमंत संखे, डहाणू तालुकाध्यक्ष किशोर कुडू, दाभलेचे सरपंच विजय वायडा, पडघेचे सरपंच अनिल हाडळ, पास्थळचे सरपंच आनंद सोमण, नीहेचे सरपंच एकनाथ हेमाडा यांनी वापी येथे जाऊन भोईर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि कुटुंबीयांना धीर दिला.
सरपंचांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करा
दरम्यान, संखे म्हणाले, की राज्यात गावगाडा हाकण्यामध्ये सरपंचांचे मोठे योगदान आहे. सरपंच गावासाठी वेळ देऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावत आहेत; परंतु गावाच्या विकासाचे काम करीत असताना काही दुखावलेले लोक विचाराने विरोध करण्याऐवजी आता थेट सरपंचांवर हल्ला करतात. याप्रकरणी कायदा अधिक कडक करून सरपंचांच्या सुरक्षिततेची व्यवस्था सरकारने करायला हवी. पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. भोईर यांच्यावरील हल्ला प्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे; परंतु अद्यापही आरोपी सापडले नाहीत. भोईर कोमातून बाहेर आल्य़ानंतरच या हल्ल्याचे सूत्रधार समजू शकतील.
सरपंचांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा अधिक कडक करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांची महाराष्ट्र सरपंच परिषदेचे सर्व सदस्य लवकरच भेट घेणार आहेत. सरपंचांवरील हल्ले रोखले तरच सरपंचांना गावात चांगली विकासाची कामे करता येतील आणि निर्भयपणे योजना राबवता येतील.
कोट
‘राज्यात सरपंचांवर होणारे हल्ले हे दुर्दैवी असून त्यामुळे सरपंचांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सरपंचांना सुरक्षितपणे काम करता यावे असे वातावरण निर्माण करण्यासाठी कायदे अधिक कडक करण्याची आणि संबंधितांवर कठोर शिक्षा होण्याची आवश्यकता आहे.
हेमंत संखे, अध्यक्ष, सरपंच परिषद, पालघर जिल्हा

















