पुणे आणि नाशिक जिल्ह्याला गुरूवारी अवकाळी पावसाने झोडपलं होतं. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने जणजीवन विस्कळीत झाले आहे. अनेत जणांचा बळी जाऊन प्राण्यांचाही बळी गेला आहे. त्यासह मुंबईतही काही ठिकाणी काल हलक्या सरींचा पाऊस झाल्याची नोंद होती.
येत्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील 24 तास इशारा
भारतीय हवामान विभागाने, पुढील 24 तासांसाठी मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातही हलक्या सरींच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. मुंबईतही पारा 33 अंश सेल्सिअसवर पोहोचला. तसेच, कोकणातही तापमान कमी झाले असून काही काळासाठी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
अरबी समुद्र आणि आसपासच्या प्रदेशातील हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आणि उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान अस्थिर झालं आहे. त्यामुळे येत्या 1 -2 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावासची शक्यता आहे. दरम्यान, या बदलत्या हवामानाचा फटका उत्तर भारतात सर्वाधिक ठिकाणी बसला असून पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यातही पावसाची शक्यता आहेय
पिंपरीत मुसळधार; पुनावळे भुयारी मार्ग ठप्प
पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या जोरदार पावसाचा फटका पुनावळे परिसराला बसला असून, भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली. अचानक पाणी साचल्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागली आणि दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
शहरात दुपारपासून पावसाचा जोर कायम असल्याने भुयारी मार्गात पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही वाहनांनी पाण्यातच बंद पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक वळवण्याचा निर्णय घेऊन रावेत, भुमकर चौक आणि ताथवडे या मार्गांकडे वाहनांचा ओघ वळवला.

















