राज्यातील दहावीची परीक्षाचालू झाल्या असून, यंदा राज्यभरात एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. मात्र, त्यापैकी ५५४ केंद्रांवर १०.८३ टक्के सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे राज्यातील १९१ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी ४२ केंद्रांवर सीसीटीव्हीविना परीक्षा होणार आहे. त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) यांच्या वतीने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेदरम्यान काही ठिकाणी वैयक्तिक तसेच सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यभरात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत असून, विभागीय मंडळ स्तरावरही विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळ सदस्य व जिल्हास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांनाही परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास…
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले की, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे किंवा प्रत्यक्ष गैरमार्गाने वर्तन करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.
सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची बदली
राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ५५४ केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा नाही, त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे गैरप्रकारांना प्रतिबंध होईल.
राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांची नोंदणी
आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा आजपासून (दि.20) सुरू होत आहे. राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८७९ ने जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळल्यानंतर, राज्य मंडळासमोर यावर्षी दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे आव्हान आहे.
















