पालघर-योगेश चांदेकर
संघटनात्मक बांधणीवर भर देणार
पालघरः समीर मोरे पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधणी केली होती. आठ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला होता, तर नऊ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मनसेचे सदस्य होते; परंतु मध्यंतरी मोरे हे पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेत गेले होते; मात्र मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना पुन्हा मनसेत आणून पालघर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.
मोरे हे जनसामान्यात मिसळणारे असून, त्यांना गाव पातळीवरचे विविध प्रश्न माहीत आहेत. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ते संघर्ष करीत असतात. त्या संघर्षातून लोकांचे प्रश्न मार्गी लागतात. सातत्याने लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा नेता आणि प्रश्नांची तड लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांमध्ये सातत्याने राहून त्याच्या अडीअडचणीत धावून गेल्यामुळे मोरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. संघटनात्मक बांधणीवरही त्यांनी सातत्याने भर दिला. त्यामुळे तर पालघर जिल्ह्यात मनसेचे आठ सरपंच आणि नऊ उपसरपंच झाले. पंचायत समितीतही एक सदस्य निवडून आला.
पालघरची संपूर्ण जबाबदारी मोरेंवर
मध्यंतरी पक्षांतर्गत मतभेदामुळे मोरे यांना पक्ष सोडावा लागला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्तेही शिवसेनेच्या शिंदे गटात गेले. मनसेला पालघर जिल्ह्यात हा मोठा धक्का होता. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना साकडे घालून मोरे यांना पुन्हा मनसेत आणण्याचा आग्रह धरला. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांनी पक्षांतर्गत गटबाजी संपवण्यासाठी नेत्यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन केले. अविनाश जाधव यांना ठाण्याची जबाबदारी देऊन, पालघर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी मोरे यांच्यावर सोपवली.
अमित ठाकरे यांच्या घोषणेचे स्वागत
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमित ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याच्या मनसेच्या पदाधिकांच्या बैठकीमध्ये समीर मोरे यांची पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच पक्ष बांधणीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. मोरे यांची पालघर जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पुन्हा मनसेत सामील झाले. मोरे यांनी आपण लवकरच पालघर जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले. या दौऱ्यात अनेक कार्यकर्ते पुन्हा पक्षाशी जोडले जातील. अमित ठाकरे यांच्यासोबत झालेल्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ग्रामीण जिल्हाध्यक्ष भावेश चुरी, उपजिल्हाध्यक्ष विपुल पटेल, यशोधन पाटील, विशाल जाधव, योगेश पाटील, धीरज गावड, मनविसेचे जिल्हाध्यक्ष विजय गांगुर्डे, उपाध्यक्ष निशांत धोत्रे, पालघर शहराध्यक्ष सागर शर्मा, डहाणू तालुकाध्यक्ष तन्मय संखे, सत्यम मिश्रा, हमेश पाटील, नवल मोरे, सतीश ठाकुर, मंदार तांडेल, हर्षल ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते.
कोट
‘राज ठाकरे यांच्यावर आमची कधीही नाराजी नव्हती. त्यांचा आदेश शिरसावंद मानून मी शिवसेनेच्या शिंदे गटातून पुन्हा मनसेत आलो. आता माझ्यावर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. राज ठाकरे यांनी सोपवलेली जबाबदारी मी पक्षासाठी पूर्ण वेळ देऊन पार पडेल आणि पक्षाचे संघटन पालघर जिल्ह्यात मजबूत करीन.
समीर मोरे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, मनसे