अकरावीसाठीच्या ऑनलाइन पोर्टलवर निश्चित क्षमतेनुसारच इयत्ता बारावीचे प्रवेश द्यावेत असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.
पोर्टलवर निश्चित प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिला, कला व वाणिज्य शाखेतून विज्ञान शाखेत शाखा बदल करून प्रवेश दिल्यास संबंधित विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त प्रवेशाला मोठा आळा बसेल असे सांगितले जात आहे.
ज्यातील सर्वच भागात इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार प्रवेशासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. प्रक्रियेसाठी राज्यातील सर्व विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आलीली आहे. आता याच निश्चित क्षमतेनुसार इयत्ता बारावीची प्रवेश प्रक्रिया करावी लागणार आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांना याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले. पत्रात म्हटले आहे, शासकीय कनिष्ठ महाविद्यालये स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत उच्च माध्यमिक विद्यालये खाजगी संस्थेमार्फत चालविल्या जाणारे अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालये यांना सूचित करण्यात येते की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११वी वर्गासाठी ऑनलाइन पोर्टलवर निश्चित करण्यात आलेल्या प्रवेश क्षमतेनुसारच इयत्ता १२ वी वर्गाची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात येत आहे. यासह ३० सप्टेंबर अखेर इयत्ता ११ वी आणि इयत्ता १२ वी वर्गात झालेल्या प्रवेशाची पडताळणी करण्यासाठी तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना द्यावयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व भौतिक सुविधा यांची पूर्तता संबंधित व्यवस्थापन करते किंवा नाही, या बाबीची पडताळणी करण्यात येणार आहे.
Maharashtra 12th admission 2025: शिक्षण विभागाने उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांना इयत्ता बारावीचे प्रवेश ऑनलाइन पोर्टलवर निश्चित क्षमतेनुसारच देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिल्यास किंवा शाखा बदल करून प्रवेश दिल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द होऊ शकते. प्रवेशांची पडताळणी केली जाणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण व भौतिक सुविधांची उपलब्धता तपासली जाईल.