पालघर-योगेश चांदेकर
पालघरः वि. म.पाटील कृषी प्रतिष्ठान आयोजित अस्तित्व संमेलनात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नितेश पाटील यांना आमदार राजेंद्र गावीत जिल्हाप्रमुख कुंदन संखे, डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजू माच्छी, विवा कॉलेजचे अध्यक्ष संजीव पाटील, वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील,तालुका प्रमुख संतोष देशमुख उपाध्यक्ष विकास पाटील, यांच्या हस्ते “उद्योगश्री” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छोट्या व्यवसायातून सुरुवात करून, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन या त्रिसूत्रीवर उभा असलेला त्यांचा उद्योग प्रवास आज राष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे.
पाटील यांनी २०१७ मध्ये कोपरगावच्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हिल इंजिनीयरिंग) पदवी पूर्ण केली. शिक्षणकाळातच पायाभूत सुविधा क्षेत्रात देशाच्या विकासात हातभार लावण्याची त्यांची इच्छा होती. २०१८ पासून स्वतःचा व्यवसाय सुरू करत त्यांनी गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या छोट्या प्रकल्पांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पांपर्यंत पोहोचला आहे.

गुणवत्तापूर्ण कामाची दखल
बांधकाम क्षेत्रात नव्याने व्यवसाय सुरू करून प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन यांवर त्यांनी भर दिला. या गुणवत्तापूर्ण कामाची दखल घेत वि. म.पाटील कृषी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अस्तित्व संमेलनात त्यांना ‘उद्योगश्री’ पुरस्कार देण्यात आला. त्यांनी २०१८ नंतर हळूहळू व्यवसाय वाढवत नेला आणि आज या व्यवसायाच्या छोट्याशा रोपट्याचे मजबूत वटवृक्षात रूपांतर झाले. सातत्य, कष्ट आणि विश्वास यांच्या आधारावर हा प्रवास अधिक भक्कम होत आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पात कार्यरत
सध्या ते देशातील महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल हाय-स्पीड रेल प्रोजेक्ट’ (बुलेट ट्रेन) मध्ये कार्यरत आहेत. आधुनिक भारताच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत मोलाचे योगदान देत आहेत. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून समाजासाठी अधिक व्यापक योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीत योगदान गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे त्यांनी सांगितले.
कोट
‘हा गौरव केवळ वैयक्तिक नसून कुटुंबीयांचा त्याग, सहकाऱ्यांचे समर्पण आणि हितचिंतकांच्या आशीर्वादांचे फलित आहे. वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान आयोजित अस्तित्व संमेलनात ‘उद्योगश्री’ या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले, ही माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी घटना आहे. या पुरस्कारामुळे माझ्या कार्याला केवळ मान्यता मिळाली नाही, तर समाजासाठी अधिक व्यापक आणि दर्जेदार योगदान देण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. हा गौरव केवळ माझ्या नावापुरता मर्यादित नसून माझ्या कुटुंबीयांचा त्याग, सहकाऱ्यांचे समर्पण आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आशीर्वाद यांचे फलित आहे.
नितेश पाटील, बांधकाम व्यावसायिक, ‘उद्योगश्री’ सन्मानप्राप्त

















