पालघर-योगेश चांदेकर
पाच लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल
पालघरः पालघर तालुक्यातील केळवा, माहीम आणि इतर १७ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पालघर तालुक्याच्या पश्चिमेकडील केळवा, माहीम आणि समुद्रकिनारी असलेल्या सतरा गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या योजनेची देखभाल दुरुस्ती केली जाते. या योजनेला झांजरोळी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपिंग हाऊसमध्ये २५ अश्वशक्ती क्षमतेचे दोन आणि ४० अश्वशक्ती क्षमतेचा एक असे मिळून तीन पंपाची वीज मोटर सुरू करणे आणि बंद करण्याच्या कामासाठी कंट्रोल पॅनल बसवण्यात आले आहेत.
वर्षभरापूर्वी दुरुस्ती, तरी काढले काम
वर्षभरापूर्वीच या पंपिंग हाऊसमधील विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. जुने कंट्रोल पॅनल स्टार्टर सुस्थितीत आणि व्यवस्थित काम करीत असताना नवीन कंट्रोल पॅनल स्टार्टर न बसवता दुरुस्तीच्या नावाखाली चार लाख ९४ हजार १८४ रुपयाचे देयक ठेकेदाराला अदा करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत १४ जुलै २०२३ रोजी ठेकेदाराला ही रक्कम देण्यात आली.
अधिकारी, ठेकेदाराचे संगनमत
दुरुस्तीच्या कामांमध्ये कंट्रोल पॅनलमधील विद्युत उपकरणांची दुरुस्ती महावितरणच्या दरपत्रकानुसार करणे अपेक्षित होते; परंतु पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता आणि ठेकेदारांनी दुरुस्तीचे कोणतेही काम न करता परस्पर जुनी विद्युत उपकरणे नवीन टाकल्याचे दाखवून चार लाख ९४ हजार हजार १८४ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला.
आरोप असलेल्या अधिकाऱ्याचा पालघरवर डोळा
पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रशांत इंगळे यांच्या काळात हा अपहार झाला असून ते सध्या वसई येथे कार्यरत आहेत पुन्हा पालघर येथे येण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. नवीन टाकण्यात आलेल्या कंट्रोल पॅनल स्टार्टरची खरेदीची पावती असणे आवश्यक होते; परंतु ती उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या पाणीपुरवठा योजनेचे सध्या किती पंप चालू आहेत व दुरुस्तीसाठी किती गेले आहेत याची माहिती घेणे आवश्यक आहे.
ठेकेदावर कारवाई, अधिकारी मोकाट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी गेल्या काही दिवसांत चार ठेकेदारांवर कारवाई केली असली, तरी अधिकारी मोकाट असल्याने पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार सुरूच असतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते, तरीही योजना अपूर्ण राहतात. दुरुस्तीच्या नावाखाली योजनांवर पुन्हा खर्च काढला जातो. तरीही पाण्यासाठी दाही दिशा काही संपत नाहीत. दरम्यान, यासंबंधी अनेक तक्रारी पुढे आल्या असून या विभागातील सर्वच कामाची चौकशी केली, तर अन्य किती ठिकाणी अशा प्रकारचे गैरव्यवहार झाले हे समजू शकेल.