पालघर-योगेश चांदेकर
मित्र पक्षांबरोबर मैत्रीपूर्ण लढती करण्याचे भरत राजपूत यांचे सूतोवाच
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि चार नगरपालिका, पंचायत समित्याही ही ताब्यात घेणार
पालघरः पालघर जिल्हा हा एकेकाळी जरी शिवसेनेचा बालेकिल्ला असला, तरी आता तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला नसून भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. भारतीय जनता पक्षात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. आजच तीन हजार ते साडे तीन हजार कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला असून आता भाजपशी सामना करण्याची कोणत्याही पक्षात ताकद राहिलेली नाही, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, चार पंचायत समित्यांचे सभापतिपद आणि चार नगरपालिकांचे अध्यक्षपद भाजपला नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेनेचा शिंदे गट,उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच अन्य राजकीय पक्षातून सुमारे तीन हजार ते साडे तीन हजार कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे कैलास म्हात्रे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. राजपूत यांनी या वेळी कोणाबरोबर किती कार्यकर्ते पक्षात आले, याचा तपशील दिला. या वेळी कार्यकर्त्यांची एवढी गर्दी झाली होती, की सभागृहात बसायलाही जागा राहिली नव्हती.
प्रदेशाध्यक्षांचा मोबाईलवरून संवाद
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काही कार्यबाहुल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित होऊ शकले नाहीत; परंतु त्यांनी मोबाईलवरून संभाषण करत भाजप प्रवेश केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, उलट त्याला सन्मान मिळेल असे सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर यश
या वेळी राजपूत म्हणाले, की भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षात पालघर जिल्ह्यामध्ये चांगलाच रुजला आहे. लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही भांडून ही जागा पदरात पाडून घेतली. त्या वेळी कोणालाही या जिल्ह्यात भाजपचा उमेदवार विजयी होईल असे वाटले नव्हते; परंतु भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आपले उमेदवार डॉ. हेमंत सवरा दोन लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास मला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या नेत्यांना आपण तसा शब्द दिला होता. त्यानुसार डॉ. सवरा पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही पालघर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नव्हता; परंतु मी शब्द दिल्याप्रमाणे या जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार तर मित्र पक्षाचे दोन आमदार विजयी झाले आहेत, असे राजपूत यांनी निदर्शनास आणले.
जिल्हा परिषदेच्या ३५ जागा जिंकू
या वेळी ते म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कार्यकर्त्यांनी हातात घेतल्या होत्या. त्यामुळे आपले आमदार, खासदार निवडून आले; परंतु आता निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पालघर जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याची आपल्याला संधी आहे. जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी ३५ जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपलाच असेल. त्याचबरोबर पालघर नगरपालिका, डहाणू, वाडा आणि जव्हार नगरपालिका या ठिकाणी भाजपची सत्ता येईल. डहाणूमध्ये तर विरोधकांचा एकही उमेदवार निवडून न येता सत्तावीसच्या २७ जागा भाजपला मिळतील, असा दावा राजपूत यांनी केला. याशिवाय वाडा, जव्हार, डहाणू, पालघर अशा पंचायत समित्यांची सत्ता ही भाजपला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमध्ये सुमारे २६२ जागा असून भाजपच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी संधी मिळावी, म्हणून कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीत युती करणार नाही. स्वबळावर ही निवडणूक लढवून आवश्यकता असल्यास निवडणुकीनंतर मित्र पक्षाशी युतीबाबत चर्चा करता येईल. २६२ जागांपैकी भाजपच्या कार्यकर्त्यांना दीडशे जागा नक्कीच मिळतील आणि पालघर जिल्हा हा भाजपचाच असल्याचे सिद्ध होईल, असे त्यांनी सांगितले
कार्यकर्त्यांचाही स्वबळाचा आग्रह
या वेळी कार्यकर्त्याकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या, की युती करून लढवायच्या याबाबत राजपूत यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे स्वबळाचा आग्रह धरल्यामुळे भाजपच्या प्रदेश पातळीवर होणाऱ्या बैठकीत आपण असा आग्रह धरून निवडणुका स्वबळावरच लढवल्या जातील, अशी घोषणा राजपूत यांनी केली.
कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ
या वेळी खा. डॉ. हेमंत सवरा म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही पदावर असले, तरी ते स्वतःला कार्यकर्ते समजतात. आम्हीही कार्यकर्ते आहोत आणि भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो कोणाचीही खासगी मालमत्ता नाही. कार्यकर्त्याच्या जीवावर आम्हाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. आता कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आली आहे. अशा वेळी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एवढ्या संख्येने कार्यकर्ते पक्षात येत असतील, तर पक्षाला निश्चित चांगले भवितव्य आहे असा दावा त्यांनी केला.

जिल्हा परिषद आजच जिंकली
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम म्हणाले, की राजपूत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकाच दिवसाच्या अल्पकालीन नोटीसवर अडीच हजार कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत असतील, तर पक्ष आजच जिल्हा परिषद निवडणूक जिंकला आहे आणि भाजपचा उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष झाला आहे हे नक्की समजा.
सदर कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भाजपचे जेष्ठ नेते बाबजी काठोळे, खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी नगरसेवक जगदीश राजपूत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे, सुशील औसरकर, संदीप पावडे, वीणा देशमुख, लक्ष्मीदेवी हजारी प्रशांत संखे,अशोक वडे, सचिन पाटील, नंदन वर्तक, तुषार संखे, भावानंद संखे, देवानंद शिंगडे, विशाल नांदलस्कर,मिलिंद वडे, गौरव धोडी, पिनल शाहा, संतोष चोथे, हर्षद पाटील, महेंद्र भोणे, अरुण माने, प्रणय म्हात्रे, अंकुर राऊत, लतेश राऊत, वसंत गोरवाला, सुरेश शिंदा आदी मान्यवर उपस्थित होते.
‘भारतीय जनता पक्षात सर्वच पक्षातून कार्यकर्ते येत आहेत. या आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला जाईल. भाजपत ज्यांनी प्रवेश केल्याचा त्यांना कधीही पश्चाताप होणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने दोनदा पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले. अनेक संधी दिल्या. अशा स्वरूपाच्या संधी नवीन आलेल्या कार्यकर्त्यांनाही मिळतील. जुन्या-नव्याचा मेळ घालून पक्षाला निश्चित यश मिळवून देण्यात येईल. पुढचे दोन महिने ‘ना सोने दुँगा, सोने दुँगा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे आपल्याला जिल्हा पिंजून काढायचा आहे आणि त्या जीवावर भाजपाची जिल्ह्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्ता आणायची आहे.
भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष, भाजप, पालघर

















