इस्रायलने आज पहाटे इराणवर अत्यंत अचूक आणि नियोजित हवाई हल्ला करत १०० हून अधिक लक्ष्यांवर मारा केला. “ऑपरेशन रायझिंग लायन” या विशेष मोहिमेअंतर्गत इस्रायलने F-35I ‘अदिर’ आणि F-16I ‘सुफा’ लढाऊ विमानांच्या साहाय्याने इराणच्या क्षेपणास्त्र विकास केंद्रांवर, नतान्झ अणुस्थळावर आणि हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला.
ही कारवाई भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या “ऑपरेशन सिंदूर” ची आठवण करून देणारी ठरली आहे.
भारताने “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे, लाँच पॅड्स आणि प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ला केला होता. भारताचे Su-30MKI आणि राफेल लढाऊ विमाने पाकिस्तानी हद्दीत घुसून निशाणा साधत होती. त्याचप्रमाणे, इस्रायलनेही इराणमधील लष्करी संरचना, अणुउपक्रम केंद्रे आणि रडार यंत्रणा नष्ट केल्या. दोन्ही देशांच्या कारवायांचे उद्दिष्ट एकच – शत्रूच्या भूमीवर तंतोतंत आणि धडक कारवाई करून त्यांची सामरिक क्षमता खिळखिळी करणे.
‘पोपाय’ क्षेपणास्त्राचा निर्णायक वापर
इस्रायली हवाई दलाने या कारवाईत ‘पोपाय’ हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र (ASM) वापरले. हे क्षेपणास्त्र इस्रायली एरोस्पेस इंडस्ट्री ने विकसित केले असून, याची अचूकता, लांब पल्ल्याची क्षमता आणि जड वॉरहेडमुळे ते अत्यंत प्रभावी मानले जाते. 340 ते 450 किलो स्फोटक क्षमतेसह, हे क्षेपणास्त्र बंकर, रडार, कमांड सेंटर आणि हवाई तळ उद्ध्वस्त करण्यात सक्षम आहे. विशेष बाब म्हणजे भारतानेही याच ‘पोपाय’ क्षेपणास्त्राचा वापर सुक्कुरमधील पाकिस्तानी हवाई दलाच्या TPS-43J रडार प्रणालीवर केला होता. हे दर्शवते की भारत आणि इस्रायल केवळ शस्त्रास्त्रच नव्हे, तर रणनीतीही सामायिक करत आहेत.
प्रगत शस्त्रास्त्रांचा वापर – सामरिक साम्य
भारताने जसे ऑपरेशन सिंदूरमध्ये अचूक मार्गदर्शित बॉम्ब वापरले, तसेच इस्रायलनेही GBU-39 SDB, JDAM आणि AIM-120 AMRAAM यांसारख्या आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. हवाई कारवायेत दोन्ही देशांनी फक्त शक्तीच नव्हे, तर तंत्रज्ञान, गुप्तचर माहिती आणि एआय आधारित लक्ष्यीकरण यांचा वापर करत अत्यंत यशस्वी आक्रमण साधले.
सीमा आणि अंतराचा फरक, पण उद्दिष्ट समान
भारताच्या कारवाईत एक मोठा सामरिक लाभ होता – पाकिस्तान भारताचा शेजारी देश असल्याने लष्करी कारवाई सहज शक्य होती. परंतु इस्रायलसाठी इराणवर थेट हल्ला करणे अधिक गुंतागुंतीचे होते. इराण इस्रायलपासून हजारो किलोमीटर दूर असून, तिथे हल्ला करण्यासाठी इस्रायलने तब्बल २०० लढाऊ विमानांची रणनीतिक तैनाती केली होती.
तथापि, दोन्ही देशांनी आपल्या कारवायांपूर्वी उपग्रह, ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) फीड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लक्ष्य निश्चित केली. भारताच्या कारवायेत गुप्तचर संस्था आणि उपग्रह डेटाचा महत्त्वाचा वाटा होता, तर इस्रायलने मोसाद व अमेरिकन गुप्तचर संस्थांद्वारे लक्ष्य ओळखले होते.
नव्या युतीचे संकेत
भारत व इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्य हे यापूर्वीपासूनच मजबूत आहे, पण सध्याच्या कारवायांनी त्यात एक नवे परिमाण दिले आहे. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण, सामायिक रणनीती, गुप्तचर माहितीचे समन्वयीत वापर आणि तंत्रज्ञानाधारित हल्ले यामुळे हे दोन्ही देश भविष्यातील युद्धनितीचे नवे उदाहरण म्हणून समोर येत आहेत.
भारत आणि इस्रायल या दोघांनीही आधुनिक तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि अचूकतेच्या जोरावर जागतिक स्तरावर स्वतःची लष्करी ताकद सिध्द केली आहे. ‘पोपाय’ क्षेपणास्त्र या दोन्ही देशांसाठी ब्रह्मास्त्र ठरले असून, सामरिक दृष्टिकोनातून ही युती भविष्यातील भूमिकांवर निर्णायक परिणाम घडवू शकते.