पालघर-योगेश चांदेकर
तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण
पालघरः डहाणू व तलासरी तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी निवारण करण्यासाठी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी जनता दरबार भरवला होता. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार भरवण्यात येईल, अशी प्रतिपादन खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केले. डहाणू व तलासरी तालुक्यात सुमारे दीडशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारीचे निवारण जागच्या जागी करण्यात आले. अनेक तक्रारींवर पंधरा दिवसात काय कारवाई झाली, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश खा. सवरा यांनी दिले

पालकमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी जिल्हास्तरावर जनता दरबार भरवला होता. त्यात पाचशेहून अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी काहींचे निवारण झाले. या पार्श्वभूमीवर आता डॉ. सवरा यांनीही जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे. पंचायत समिती सभागृहात झालेल्या जनता दरबाराला भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबजी काठोळे, उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत, प्रांताधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, मुख्याधिकारी अक्षय गुडधे, बांधकाम विभागाचे उपअभियंता पगारे, गटशिक्षणाधिकारी संजय वाघ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज कोरे यासह विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बहुतांश तक्रारींचे निवारण तालुकास्तरावर
खा. सवरा म्हणाले, की ग्रामीण भागातील जनतेच्या बहुतांश तक्रारी या तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांशी निगडीत असतात. ७५ ते ८० टक्के तक्रारीचे निवारण तालुकास्तरावर होत असते. त्यामुळे तालुकास्तरावर जनता दरबार घेण्याचे आपण ठरवले आहे. डहाणू व तलासरीनंतर पालघर जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही जनता दरबार भरविण्यात येईल. जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या भेटीगाठी होतात. जनतेला आपल्या तक्रारी स्थानिक पातळीवर मांडता येतात. अधिकारी ही स्थानिक असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर ७५ ते ८० टक्के तक्रारीचे निवारण होऊ शकते.

जनतेच्या सोईसाठी तालुकापातळीवर जनता दरबार
अनेकदा सामान्य जनतेला जिल्हास्तरावर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे तालुकास्तरावर जनता दरबार भरवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. अन्य तालुक्यात आता अशा प्रकारचे जनता दरबार भरवण्यात येईल. डहाणू व तलासरी या दोन तालुक्यात सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर जागच्या जागी उपाययोजना निघाल्याने जनता ही समाधानी आहे. अधिकाऱ्यांनाही जनतेशी सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे जनतेचाही अधिकाऱ्यांशी संबंध येतो. या जनता दरबारात अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अनेकदा नागरिकांचे फार काळ प्रलंबित राहिलेले प्रश्नही अशा जनता दरबारातून निकाली निघतात.
कोट
‘जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेला भेटता येते. सामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेता येतात आणि तालुका पातळीवरच हे प्रश्न निकाली काढता येतात, याचे मोठे समाधान आहे.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर

















