शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्थांचे योगदान आवश्यक असल्याचे सांगत प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले जावे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतानाच शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशियल इंटिलीजन्स) सारख्या माध्यमांचा शालेय शिक्षणात उपयोग करावा. प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले जावे. पहिलीच्या विद्यार्थ्यास किमान बाराखडी व अंक गणिताची ओळख असणे, दुसरीच्या विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करण्यात येईल. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यासोबत इतर योजनांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास केला जावा. तसेच साफसफाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावी शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर विद्यार्थ्यांवर पोलीस विभागाने दामिनी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी, अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
धुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी शिक्षण विभागामार्फत राबवावयाचा १० सूत्री कार्यक्रम तसेच शिक्षकांच्या अडचणी सोडविण्याबाबत, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण कॉपीमुक्त अभियानाबाबत माहिती दिली. प्रांरभी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनीष पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुवर, डाएटच्या प्राचार्या मंजुषा क्षिरसागर यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
आठवीपासून आठ झोनमध्ये शाळा
नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सुपर ५० सारखे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत. आगामी काळात किमान आठवीपासून आठ झोनमध्ये विविध क्षेत्रातील शाळा सुरू करणार आहे. यात कला, क्रीडा, इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, विज्ञान, डिजिटल शाळा सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात २०० पेक्षा जास्त पटाच्या शाळेचा एक गट तयार करून स्मार्ट शाळा सुरू करणार, शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जलदगतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शाळाबाह्य कामे कमी करण्याचा आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.