पालघर-योगेश चांदेकर
पालघरः मकर संक्रात हा सण एकमेकांशी गोड बोलण्याचा, परस्परांमधील दुरावा कमी करण्याचा, अबोला घालवण्याचा आणि एकमेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आहे. जीवन सुरक्षित असेल, तरच जीवनात आनंद निर्माण करता येतो, हे लक्षात घेऊन पालघर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सुरक्षा अभियान हाती घेतले. त्यात तिळगूळ वाटप करण्याबरोबरच वाहतूक विषयक सुरक्षिततेचे नियम पाळण्याचा धडा गोड बोलून घालून दिला.
देशात रस्ता अपघाताचे प्रमाण मोठे असून त्यात दरवर्षी दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यातही उत्तर प्रदेशाखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असून महाराष्ट्रात दरवर्षी पंधरा हजाराहून अधिक बळी रस्ता अपघातात जातात. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षेचे नियम पाळले, तर अपघात कमी होऊ शकतील.
नितीन गडकरी यांची चिंता
केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत बोलताना भारतात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून, जगात अन्यत्र आपल्याला त्यामुळे तोंड दाखवायला लाज वाटते, असे उद्गार काढले होते. या पार्श्वभूमीवर रस्ते अपघात टाळण्यासाठी आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाहतूक सुरक्षा अभियान हाती घेण्यात आले आहे.
दुचाकी अपघातात ७६ हजार मृत्यू
अपघातात बळी जाणाऱ्यांपैकी सुमारे ४४ टक्के म्हणजे ७६ हजार लोक हे दुचाकीस्वार असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी दुचाकीस्वारांना संक्रातीच्या शुभेच्छा देऊन अपघात कसे टाळता येतील, याबाबत धडे दिले. अपघात कसे होतात, हेही समजावून सांगितले.
कसे होतात अपघात?
दुचाकीवर दोघेजण बसले असतील, तर ते परस्परात बोलतात. अशावेळी रस्त्याकडे चालकाचे दुर्लक्ष होते आणि त्यांचे वाहनावरचे नियंत्रण सुटून अपघात होतो. अनेकांना गुटख्यासह अन्य काही खाण्याची सवय असते. ते थुंकताना सूत्र न जुळल्याने अपघात होतो आणि त्यात काहींचा बळी जातो. काही लोकांना वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याची सवय असते. वास्तविक मोबाईलवर बोलण्यास वाहन चालविताना बंदी असतानाही बस चालकांसह अन्य कुणीही हे ऐकण्याचा मनस्थितीत नसततात. मोबाईलवर बोलत असताना आजूबाजूच्या वाहनांचा किंवा मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही तसेच वाहन चालवताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होते, त्यातूनही अपघात होतात. त्यात तरुणींचे प्रमाणही कमी नाही.
आपली कुणीतरी वाट वाट पाहत आहे!
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर वाहतूक पोलिसांनी या सर्व घटकांना वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या, आपली कुणीतरी वाट पाहत आहे असा संदेश त्यातून दिला वाहन चालवताना आपली चूक असो, की इतरांची; आपली सुरक्षा आपल्यालाच करायला हवी. त्यासाठी मेंदू सुरक्षा कवच म्हणजे हेल्मेटही वापरायला हवे. हेल्मेट वापरण्याबाबत अनेकदा नियम करून आणि सांगूनही कोणी ऐकत नाही. या परिस्थितीत अपघात झाला, तर चालकाचा बळी जातो.
विम्याला मुकाल!
मद्रास उच्च न्यायालयाने अपघातातील एका बळीच्या वारसांना केवळ दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरले नव्हते, म्हणून आयुर्विम्याची रक्कम द्यायला नकार दिला होता. ही परिस्थिती एकदा लक्षात घेतली, की वाहन चालवताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.
जागृतीवर भर
दुचाकीस्वारांचे मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ठोस उपाय योजनेचा भाग म्हणूनच पालघर पोलिसांनी रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत वाहन चालकांची जागृती करण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भागात तर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे, हेल्मेट परिधान न करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, ज्यादा प्रवासी घेणे, मद्य पिऊन वाहन चालवणे असे अनेक प्रकार घडत असून हे टाळण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांच्या प्रबोधनावर भर दिला असून पोलीस अधीक्षक यांच्या कल्पनेतून पालघर तालूक्यात ठिकठिकाणी वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे यांनी दिली आहे.