पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदीला विरोध करण्यासाठी विरोधी पक्षाने आयोजित केलेला मोर्चा, शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्गाला दिलेली चालना, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने केलेले घुमजाव, अंदाज समितीच्या धुळे दौऱ्यात सापडलेले कोट्यवधी रुपयांचे घबाड, पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, पावसामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांची उडालेली दणादण आदी मुद्द्यांमुळे संख्येने अल्प असलेल्या विरोधी पक्षाशी सामना करताना महायुती सरकारला आज, सोमवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन जड जाण्याची चिन्हे आहेत.
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात पहिलीपासून हिंदीसक्तीचा विषय तापला. हिंदीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी याचे पडसाद उमटणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून नेण्यास जिल्ह्यातील मंत्र्यांचाच विरोध आहे. हा विरोध डावलून महामार्गाचे काम रेटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे अधिवेशनात या महामार्गाच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारची कोंडी करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना निधी देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या पैशांवर मारलेला डल्ला यावरून विरोधी पक्ष सरकारचे वाभाडे काढण्याची संधी सोडणार नाही.
या मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता…
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
मे, जून महिन्यातील पावसाचा मुंबई, पुण्यातील जनजीवनाला बसलेला फटका
पुण्यात तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला गोंधळ