मुंबई : भारतातील प्रत्येक नागरिकाने स्वतःला भारतीय समजावे. असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ‘मुसलमान हे या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत. फक्त त्यांनी स्वतःला हिंदुस्थानी मानावे असे भागवत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व हिंदुस्थानींचा ‘डीएनए’ एकच असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काही सवाल उपस्थितीत केले आहे.
Home
पालघर
सरसंघचालक मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यामागे काही विशेष संदेश आहे का..; सामनाच्या अग्रलेखातून सवाल उपस्थित
सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यामागे काही विशेष संदेश आहे का..; सामनाच्या अग्रलेखातून सवाल उपस्थित
धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे. ते थांबवा! सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले. त्यामागे काही विशेष संदेश आहे काय? असा संशय शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे.
हिंदुस्थानात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही, असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. त्यावर आता राष्ट्रीय चर्चा व्हायला हरकत नाही. मुळात असे काय घडले की, सरसंघचालकांना मुसलमानांना त्यांच्या ‘डीएनए’ची आठवण करून द्यावी लागली. गेल्या पाच-सहा वर्षांत देशाचे वातावरण अतिफाजील, उन्मादी लोकांच्या हाती गेले. निवडणूक राज्याची असो नाहीतर देशाची, दंगली, उन्माद, धार्मिक फाळणी, धर्मद्वेष हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा अजेंडा राहिला’ असं म्हणत सेनेनं निशाणा साधला.
हिंदुत्वाची आग पेटवूनही प. बंगालातील हिंदू समाजाने भाजपला साथ दिली नाही. बंगाली अस्मितेच्या मुद्यांवर तेथील हिंदू ममता बॅनर्जी यांच्याच मागे ठामपणे उभा राहिला. प. बंगालात दुर्गापूजा, हिंदुत्व खतरे में, ईश्वरचंद्र विद्यासागर विद्यापीठावरील हल्ले असे सर्व घडूनही भाजपला हिंदू-मुसलमानांत विभाजन करून निवडणुका जिंकता आल्या नाहीत. उलट या सर्व उपद्व्यापांमुळे हिंदूंची पीछेहाट झाली’ असा टोलाही सेनेनं लगावला.
‘केरळातही भाजपस्टाईल हिंदुत्व लोकांनी स्वीकारले नाही. तेथेही पराभव झाला. उत्तर प्रदेशात वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे. हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय? सरसंघचालकांनी आता देशातील मुसलमान समाजालाच हाक दिली आहे. भागवत म्हणतात, ‘‘हिंदुस्थानात इस्लाम धोक्यात आहे, या भीतीच्या जाळ्य़ात अडकू नका. कारण धर्म कुठलाही असला, तरी सर्व हिंदुस्थानींचा ‘डीएनए’ सारखाच आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष होण्याचे कारण विसंवाद आहे. मुळात हिंदू-मुस्लिम ऐक्य ही संकल्पनाच दिशाभूल करणारी आहे. कारण हिंदू आणि मुसलमान हे एकच आहेत,’’ असे सरसंघचालक म्हणतात.
हिंदुस्थानसारख्या लोकशाही देशात हिंदू किंवा मुसलमान कुणाचाही वरचष्मा असू शकत नाही. वरचष्मा असेलच तर तो हिंदुस्थानींचा असेल, असे भागवत म्हणतात; पण सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना हे पटेल काय? गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात व राष्ट्रीय ऐक्य हेच देशाला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल, असे स्पष्ट करतात. भागवत यांनी मांडलेले विचार झटकून टाकता येणार नाहीत. उन्मादी पद्धतीने राज्य चालविणाऱ्यांचे कान सरसंघचालकांनी टोचले आहेत’.
‘गायीला देवता मानणे हा आपला धार्मिक आचार आहेच. त्या गोमांस भक्षणावरून राजकीय वातावरण तापवले गेले. घरात ‘बीफ’ आढळले म्हणून गेल्या सात वर्षांत अनेकांना झुंडशाहीचे बळी व्हावे लागले. पण जेथे हिंदुत्ववाद्यांची सरकारे आहेत अशा अनेक राज्यांत गायींचे मांस विकले जात आहे व सरकारच्या तिजोरीत त्यातून मोठी कमाई होत आहे. एका बाजूला गोमांस विक्रीवरून, प्रार्थना पद्धतीवरून झुंडबळी आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात गोमांस विक्री हे ढोंग आहे. सरसंघचालकांनी याच विसंगतीवर हल्ला केला आहे’ असे म्हणत शिवसेनेने गोवा सरकारवर निशाणा साधला आहे.
Recommendation for You

Post Views : 59 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 59 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 59 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 59 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












