पालघर-योगेश चांदेकर
पालघर-राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान ही केवळ एक औपचारिकता न राहता वाहनचालकांमध्ये प्रत्यक्ष जागृती व्हावी, या दृष्टीने जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाने उल्लेखनीय पाऊल उचलल्याचे पाहावयास मिळाले आहे. या अभियानांतर्गत चालकांमध्ये केवळ सुरक्षित वाहन चालविण्याबाबतच जागृती न करता त्यांच्या आरोग्याची काळजीही या विभागाने घेतल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरुवारी, दि. 12 जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यात जनजागृतीला प्रारंभ करण्यात आला. या दरम्यान विविध ठिकाणी अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्याबाबत मार्गदर्शन केले. याचप्रमाणे दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावर राबविण्यात आलेल्या उपक्रमात वाहनचालकांना सुरक्षिततेचे धडे देण्यात आले. यावेळी रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवणे, सीट बेल्ट बांधूनच वाहन चालवणे, दुचाकीवर नियमितपणे हेल्मेटचा वापर करणे, अतिवेगाने वाहन न चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, वाहन नेहमी डाव्या बाजूने चालवणे, अपघातग्रस्तांना मदत करणे यासोबतच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.

मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन चिंतल, प्रशांत शिंदे, प्रवीण खेडकर, जयश्री झिने, सतीश खरवडकर, पृथ्वीराज काकडे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
या दरम्यान वाहन चालक, मालक तसेच प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी वाहनचालकांनी त्यांचे अनुभव कथन केले.
अधिकाऱ्यांकडून यावेळी चालकांना पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चालकांना रस्ते सुरक्षिततेची शपथही देण्यात आली. या उपक्रमात सेवा पुरवठादर एमबीसीपीएनएल (अदानी) कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला.
जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाने केवळ मार्गदर्शनपर कार्यक्रम न घेता आगळे-वेगळे पाऊल उचलत ट्रक, टँकर, बस, टेम्पो आदी वाहनांच्या चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले.
दापचेरी येथील सीमा तपासणी नाक्यावर शनिवारी, दि. 14 जानेवारी रोजी हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे तज्ज्ञ डॉक्टरांकडून चालकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. वेदांत हॉस्पीटलच्या वतीने चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जवळपास 200 वाहनचालकांची तपासणी करून औषध वितरण करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सीमा तपासणी नाक्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय शेळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. शिबिरासाठी मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय लाड, विजय दरोडे, अमोल पवार, संजय फुंदे, अनुप सानप, जयवंत पोंदकुळे, सचिन कोतापकर, रवी चाटले, जिग्नेश गायकवाड, राजेश बोराळे यांच्यासह सद्भाव कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

















