राज्यात रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकांना अखेर गती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने पुढील पावले उचलली आहेत.
त्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर आठ महापालिकांमध्ये लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुंबईत जुन्या 227 प्रभागांनुसारच निवडणूक
मुंबई महापालिकेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, या निवडणुका पूर्वीप्रमाणेच 227 एकसदस्यीय प्रभागांनुसारच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात प्रभागांची संख्या वाढवून 236 करण्यात आली होती, परंतु सत्तांतरानंतर महायुती सरकारने ही संख्या पुन्हा 227 वर आणली. यावर सर्वोच्च न्यायालयात वाद उभा राहिला होता, मात्र न्यायालयाने नवीन याचिका फेटाळली आणि जुन्याच रचनेला मान्यता दिली.
इतर महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू
मुंबई सोडली, तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. अ, ब आणि क श्रेणींतील महानगरपालिकांमध्ये ही पद्धत लागू होणार आहे.
राज्य शासनाने महानगरपालिका आयुक्तांना प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे. लोकसंख्या, भूगोल, सामाजिक रचना यासारख्या विविध निकषांचा अभ्यास करून प्रभाग रचना केली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रियेतील तीन महत्त्वाचे टप्पे
महानगरपालिका निवडणुका पुढील तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत:
– प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चिती
– विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन
– प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया
या टप्प्यांमध्ये अनेक उप-प्रक्रिया असून, संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
ऑक्टोबरमध्ये निवडणुकांचा अंदाज
सध्याच्या घडामोडींवरून पाहता, मुंबईसह इतर ८ महापालिकांमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने निवडणूकांची तयारी सुरू केली असून, निवडणूक आयोगही प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी सज्ज झाला आहे.