दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी देशातील सर्व प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी केला आहे. यामध्ये 8 पेक्षा अधिक नगरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि बेंगळुरूसह अनेक महानगरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, देशात काही संशयास्पद हालचाली आढळल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत.
दोन दिवसांपूर्वी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधील एका डॉक्टरकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब बनवण्याचा साठा जप्त केला होता. या सर्व घटनांमुळे देशातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.
दिल्लीमध्ये स्फोटाची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी सावधगिरीची उपाययोजना अधिक कडक केली आहे. स्रोतांनुसार, मुंबई शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून महत्त्वाच्या स्थळांवर नाकाबंदी, अतिरिक्त गस्त आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे. संशयित व्यक्तींची अनियमित तपासणी (random frisking) करण्यात येणार आहे.
तसेच, संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली असून ग्राउंड इंटेलिजन्स नेटवर्क अधिक सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

















