महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा भविष्यात डिजिटल पद्धतीने घेण्याचे संकेत दिले आहेत.
यंदाच्या बारावी परीक्षेसाठी तब्बल १९०० टन कागद आणि कोट्यवधी पाने वापरण्यात आली, ज्यासाठी हजारो झाडांची कत्तल होते. हे टाळण्यासाठी ‘पेपरलेस’ परीक्षेचा विचार सुरू असून बारामतीत प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला ‘जीपीएस डिजिटल लॉक’ प्रयोग यशस्वी झाला आहे. यामुळे आता बोर्डाच्या परीक्षा हायटेक होणार असून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षा पुढील काळात डिजिटल पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक तेवढ्याच ठिकाणी कागद वापरून अन्य ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सूतोवाच राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले.
कुलकर्णी यांनी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका छपाईसाठी दहा कोटी ७२ लाख ८०,३६० पाने, नमूना उत्तरपत्रिकांसाठी १९ लाख २९,३८० पाने अशी एकूण दहा कोटी ९२ लाख ९,७४० पानांवर छपाई करण्यात आली. एकूण २२३ टन कागद वापरण्यात आला. एक कोटी सहा लाख ५६ हजार उत्तरपत्रिकांची छपाई केली असून, त्यासाठी १७०० टन कागद वापरला. परीक्षेसाठी लागणारा कागद झाडांपासून तयार होतो. पर्यावरणाचा विचार करता पुढील काळात बोर्डाच्या परीक्षा या डिजिटल पद्धतीने घ्याव्या लागतील. तेव्हाच कागदाचा वापर कमी होईल.’
प्रश्नपत्रिकांसाठी नवी पद्धत
फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेसाठी बारामती तालुक्यामध्ये दहावी-बारावी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका सुरक्षितरित्या पोहचविण्यासाठी ‘जीपीएस इनबिल्ट डिजिटल लॉक विथ ट्रंक’चा वापर प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीरीत्या करण्यात आला. त्याचा वापर राज्यभरात करता येईल किंवा कसे, या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg