तृणमूल काँग्रेसला आज पुन्हा एकदा नवा झटका बसला आहे. पक्षाच्या २० खासदारांनी स्वतंत्र गट म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठीचं अधिकृत विनंतीचं पत्र देखील या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलं आहे.
तृणमूलच्या बंडखोर खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
लोकसभेत सध्या तृणमूल काँग्रेसचे २८ खासदार आहेत तर राज्यसभेत १३ खासदार होते. यांपैकी राज्यसभेत आता १२ खासदार राहिले आहेत कारण सकाळीच एका राज्यसभा खासदारानं पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह खासदारकीचाही राजीनामा दिला. दरम्यान, लोकसभेतील २८ खासदारांपैकी २० खासदारांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला सोडचिठ्ठी देत आपला तृणमूल काँग्रेसचा वेगळा गट स्थापन केला आहे. खासदार काकोली घोष दस्तीदार या नव्या गटाचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच या २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना मान्यतेसाठी पत्र लिहिलं असून आपल्याला सत्ताधारी एनडीएसोबत जायचं असल्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हा निर्णय घेण्यापूर्वी तृणमूलच्या १४ खासदारांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची दिल्लीत भेट घेऊन बैठक केली. भाजपचे नेते भुपेंद्र यादव यांच्या घरी ही बैठक पार पडली. तर दुसरीकडं ५ खासदारांनी सकाळी राजीनामा दिलेले राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी इतर १४ खासदारांसोबत जात सर्वानुमते वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, ममता बॅनर्जींनी या आज दिल्लीतच इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यांची बैठक सुरु असतानाच दुसरीकडं त्यांच्या खासदारांनी त्यांच्याविरोधात बंड करत वेगळी चूल मांडली आणि त्यांना एक प्रकारे मोठा झटका दिला.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg