महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मतमोजणी केंद्रांवर निकालाकडे लक्ष लागले असून सुरुवातीचे कल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत.
विशेषतः मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीला सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी मिळताना दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या महानगरपालिकातसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेच्या निकालांचे प्राथमिक कल समोर आले आहेत. या सर्व ठिकाणी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांसाठी ही सुरुवात काहीशी चिंताजनक मानली जात असून पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सर्वाधिक उत्सुकता असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी आतापर्यंत 98 जागांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या प्राथमिक कलांनुसार भाजप 34 जागांवर आघाडीवर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 25 जागांवर आघाडी मिळवली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागेवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाला आतापर्यंत 5 जागांवर आघाडी मिळाली आहे.
विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे या पक्षांसाठी सुरुवातीचा टप्पा निराशाजनक ठरत असल्याचे चित्र आहे. मात्र मतमोजणीच्या अनेक फेऱ्या अजून बाकी असल्याने पुढील तासांमध्ये निकालांचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या मतमोजणी प्रक्रिया कडक पोलीस बंदोबस्तात पार पडत असून प्रत्येक फेरीनंतर नवे आकडे समोर येत आहेत. सत्ताधारी महायुती आपली आघाडी कायम ठेवते की विरोधक पुनरागमन करतात, हे पाहण्यासाठी आता काही तास निर्णायक ठरणार आहेत.

















