”मराठा आरक्षण व प्रलंबित मागण्यांसाठी आमचा लढा सुरू असून, मागण्या मंजूर होईपर्यंत मागे हटणार नाही,” असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
सरकार विश्वासघात करत असून, सापडलेल्या ५८ लाख नोंदी रद्द करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंतरवाली सराटीत शनिवारी (ता. २९) जरांगे यांनी बारावे बेमुदत उपोषण सुरू केले. गावातील ग्रामदैवत मारोती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. या वेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री संजय सिरसाट यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करून मराठा समाजाचे नुकसान केल्याचा आरोप केला. कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रासाठी लोकांनी अर्ज केले आहेत; मात्र अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत, असे ते म्हणाले.
सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या वेळी ५८ लाख नोंदी सापडल्या. संदीप शिंदे यांचे नाव मोठे होऊ नये म्हणून सरकारमध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
निर्णय न झाल्यास ‘वर्षा’वर उपोषण
”निर्णय न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही आमचे उपोषण होऊ शकते,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ”सरकारचा अध्यादेश आला, तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. सरकारवर विश्वास ठेवू नका, सरकारने फसवले आहे. सतत लढा उभा करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समजून घ्यावे. आम्हाला टिकणारे आरक्षण द्या,” असेही ते म्हणाले.
यावेळी ”तुम्ही मुंबईला जाणार का?” असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. त्यावर उपस्थितांनी मोठा जल्लोष केला. ”मुंबईत जाऊ, वर्षा बंगल्यावर जाऊ. फडणवीससाहेब काही म्हणणार नाहीत,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. मुंबईला जाण्याची घोषणा केली की सरकारकडून नोटिसा बजावल्या जातात, असेही जरांगे म्हणाले.
‘मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री, नेते तसेच गावपातळीवर आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे. जे सहभागी होणार नाहीत, त्यांची समाज नोंद घेणार आहे,” असे जरांगे म्हणाले.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg