पालघर-योगेश चांदेकर
गावित म्हणतात, ‘वीस-२२वर्षाच्या कामाची मतदार घेतील दखल!’
पालघरः पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने राजेंद्र गावित यांची काल उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी आज प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी हीच आपली विजयाची पहिली पायरी असल्याचा दावा गावित यांनी या वेळी केला.
पालघर विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे शिवसेनेचे वर्चस्व आहे. गावित यांनी यापूर्वी मंत्री, खासदार म्हणून काम केले आहे. त्यांचा एक चाहता वर्ग आहे. त्यांनी स्वतंत्र मतपेढी विकसित केली आहे. डोंगरी, नागरी आणि सागरी अशा तीनही भागात त्यांचा चांगला संपर्क आहे.
उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी
राजेंद्र गावित हे भाजपमध्ये होते; परंतु हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असल्यामुळे शिंदे गटाने भाजपमधून गावित यांना शिवसेनेत आणून उमेदवारी दिली. त्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे. खा. नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख कुंदन संखे शिवसेना प्रवक्ते केदार काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार आनंदभाई ठाकूर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, अशोक अंभूरे, बाबा कदम,तुषार पाटील, आदी उपस्थित होते.
पालघर जिल्हा निर्मितीचे शिल्पकार
या वेळी गावित यांनी गेल्या २०-२२वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला. पालघर जिल्ह्याची निर्मिती आपल्याच काळात झाली असून जिल्ह्याचे विभाजन करण्यात आपला मोठा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला दहा वर्षे पूर्ण झाली असून, या दहा वर्षात जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचा दावा गावित यांनी केला. त्यात जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज तसेच अन्य विविध शाखांची महाविद्यालये पालघर जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहेत.
कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न
कुपोषण हा आदिवासी विभागाला लागलेला शाप असून कुपोषण दूर करण्यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात आले होते. या कृती दलाच्या शिफारसी अमलात आणल्यामुळे पालघर जिल्ह्यातील बरेच कुपोषण कमी झाले असल्याचा दावाही गावित यांनी केला. अद्यापही काही कामे अपूर्ण असली, तरी आपण ती करणार आहोत. महायुतीचे सरकार राज्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा झपाटा मोठा आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दळणवळणाची अनेक कामे मार्गी लागली असून पालघर जिल्हा हा देशाच्या नकाशावर आता झळकू लागला आहे. खाडीपूल तसेच अन्य पुलांची कामे मार्गी लागले आहेत, अशी माहिती या वेळी गावित यांनी दिली.

कामदार आमदार होऊ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामे केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करताना आपण विकासकामांना गती देऊ. पालघर जिल्ह्याला कामदार आमदार हवा आहे. नावाला केवळ विधानसभेचा सदस्य नको, म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला उमेदवार म्हणून माझी निवड केली आहे. मला जनता निश्चित चांगला प्रतिसाद देईल, असा दावा गावित यांनी केला. पालघर जिल्ह्यातील मित्र पक्षाचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर असून आपण कुठलाही जातिभेद न करता विकासाच्या प्रश्नावरच केवळ निवडणूक लढवणार आहोत. गेल्या २० वर्ष २२ वर्षातील कामे मला निश्चित साथ देतील, असा दावा गावित यांनी यावेळी केला.

















