“राष्ट्रवादीचा आधार हरपला आहे; राष्ट्रवादी परिवार एकत्र आणण्याचे दादांचे स्वप्न होते”— जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर
पालघर– महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल डहाणू येथील दशश्री माळी हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.
या शोकसभेस राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आदी सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी , “दादांच्या जाण्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार विस्कळीत झाला आहे. पक्षाचा आधार हरपला आहे. ज्या वेगाने आणि कर्तृत्वाने अजितदादांनी राष्ट्रवादी परिवार पुन्हा एकत्र आणण्याचे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न दुर्दैवाने अधुरेच राहिले,” अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांनी व्यक्त केली.
“अजितदादा हे प्रशासनावर पकड असलेले, निर्णयक्षम आणि रोखठोक बोलणारे नेते होते,” असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी व्यक्त केले.तर शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी “देवत्व प्राप्त झालेले नेतृत्व आपण गमावले असून ही न भरून येणारी हानी आहे,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.

या सर्वपक्षीय शोकसभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यम ठाकूर, माजी आमदार अमित घोडा, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष करण ठाकूर, माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक, माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य, पांडुरंग बेलकर, विनायक बारी, हरेश मुकणे, जगदीश राजपूत, विशाल नांदलसकर, जिल्हाध्यक्ष रोहिणीताई शेलार, उज्वला डामसे, संजय कांबळे, विश्वास निकम, माजी पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत नगरसेविका जिल्हाध्यक्ष कीर्ती मेहता, विपुल राऊत, तन्मय बारी, अमित नहार, हेमंत धर्ममेहेर, नगरसेवक शमी पीरा, सईद शेख, सुरेंद्र अण्णा पाटील, संतोष देशमुख, हितेंद्र पाटील, पिंकी नहार, विजय म्हात्रे, संजय पाटील, तानाजी काकडे, प्रदीप लिमये यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली.
शोकसभेदरम्यान उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अजितदादांच्या सामाजिक, राजकीय व प्रशासकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. व शोकसभा संपन्न झाल्यानंतर डहाणू तालुक्यातील वाढवण येथील शंखोदर येथे अजित दादांच्या अस्थींचे विसर्जन माजी आमदार आनंद भाई ठाकूर, आमदार राजेंद्र गावीत यांच्याकडून करण्यात आले.
एकूणच ही सर्वपक्षीय शोकसभा अत्यंत शांत, गंभीर आणि भावनिक वातावरणात पार पडली.

















