सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना, महाराष्ट्र सरकारने ई-वाहन (EV) धारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार किंवा बसने प्रवास करत असाल, तर आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्गावर तुम्हाला एक रुपयाही टोल भरावा लागणार नाही
प्रदूषण कमी करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल ४६ कोटी रुपयांच्या सवलतींचा बूस्टर डोस जाहीर केला असून, ईव्ही खरेदीवर दीड लाखांपर्यंत सबसिडी देण्याची मोठी घोषणा केली आहे.
ईव्ही गाड्या खरेदी करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. आता सरकारने ईव्ही बस आणि कारसाठी खास 6 महामार्गावर टोलमाफ करण्याची घोषणा केली आहे. धोरणानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख महामार्गांवर ई वाहनांना विशेषत: चारचाकी आणि बस यांना 100 टक्के टोल माफ करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवर 50 टक्के सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
युद्धामुळे इंधन टंचाई असल्याने महाराष्ट्रात सरकारने ई वाहन धोरणांतर्गत 46 कोटी रुपयांच्या सवलतींचा बूस्टर डोस दिला. त्याच सोबत सहा महामार्गांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. ईव्ही कार खरेदी करणाऱ्यांना खास सरकार सब्सिडी देखील देत आहे. या सगळ्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल आणि प्रदूषणात देखील घट होईल असा विश्वास सरकारला आहे.
शासकीय अनुदानामुळे ई वाहनांच्या किंमती कमी होऊन सर्वसामान्य लोकांना आता कार किंवा बाइक अगदी सहज खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खर्चाची बचत होईल आणि कार घेण्याचा आनंदही मिळेल. महाराष्ट्रात नोंदणी केल्या जाणाऱ्या ईव्ही वाहनांना रस्ते कर आणि नोंदणी शुल्कातून 100 टक्के सूट देण्यात आली आहे.
नव्या धोरणानुसार ई दुचाकीसाठी 10 हजार आणि कारसाठी दीड लाख रुपयांपर्यंतची थेट सब्सिडी दिली जात आहे. या सगळ्या सवलतींमुळे ईव्ही वाहनांच्या खरेदीत वाढ होईल असा विश्वास सरकारचा आहे. त्यामुळे ईव्ही गाड्या खरेदी करण्याचे आवाहन सरकारकडून केलं जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सब्सिडी, करात सूट दिली जात आहे.

















