पालघर-योगेश चांदेकर
भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचा निर्धार
पालघरः भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरटिचणीसपदी रिकी रत्नाकर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नंदन वर्तक यांनी ही निवड केली असून त्याबाबतचे नियुक्ति पत्र रिकी रत्नाकर यांना देण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खा. डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या नेतृत्वाखाली रिकी रत्नाकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पदाची कोणतीही अपेक्षा न बाळगता त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. राजपूत यांच्यावर असीम निष्ठा ठेवून काम केल्याने त्यांच्या कार्याची अखेर पक्षाने दखल घेतली असून, भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी काम करण्याची संधी त्यांना दिली आहे.
समाजसेवेचा पिंड
रिकी रत्नाकर यांचा पिंडच मुळात समाजसेवेचा आहे. त्यांनी हर्ष स्वयंसेवी संस्था तसेच साई मंथन शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या. अनेक युवकांना खेळते केले. त्यांच्या कलागुणांना वाव दिला. कोरोनाच्या काळात रिकी रत्नाकर यांनी केलेल्या कामाची विशेष दखल घेतली गेली.
कोरोना काळात परराज्यातील मराठी माणसांना आणले परत
वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही पुरवणे, अन्नधान्याचे किटस् देणे, भुकेलेल्यांना अन्न देणे, व अन्य साहित्याचे वाटप करणे आदी उपक्रम तर त्यांनी राबवलेच; परंतु त्याचबरोबर परराज्यात कोरोनाच्या काळात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना परत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. महाराष्ट्रातून बस पाठवून अन्य राज्यात अडकलेल्या मराठी माणसांना परत महाराष्ट्रात आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. याशिवाय अन्य सामाजिक उपक्रमातही ते भाग घेत असतात. खा. सवरा, आ. भोये, भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्ताराचे काम करण्याची संधी मिळाली, यातच त्यांना मोठे समाधान आहे.
‘भारतीय जनता पक्ष हा आपला स्वतःचा पक्ष आहे, असे समजून त्यासाठी अंग झोकून काम करण्याची तयारी मी केली आहे.जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खा. डॉ. हेमंत सवरा, आ. हरिश्चंद्र भोये, आणि नंदन वर्तक यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सामान्य जनतेच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाण्याची उपजत वृत्ती माझ्यात असल्यामुळे नागरिकांना मदतीचा हात कधीही कमी पडणार नाही, याची मी ग्वाही देतो.
रिकी रत्नाकर, नवनिर्वाचित सरचिटणीस, भारतीय जनता युवा मोर्चा, पालघर जिल्हा















