महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींनी वेग घेतला असून हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) ३ जूनसाठी राज्यातील १८ जिल्ह्यांना पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
विशेष म्हणजे एका बाजूला पावसाचा इशारा देण्यात आला असताना, दुसऱ्या बाजूला कोकणातील काही जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा इशाराही देण्यात आला आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये उकाडा आणि दमट वातावरणाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी जोरदार वारेही वाहू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अधिकृत इशारा नसला तरी काही भागांत पावसाच्या सरी कोसळू शकतात.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, तसेच शेतमाल आणि पशुधनाची योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात वातावरणात मोठा बदल होत असल्याने, पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास आणि शेतीची कामे नियोजित करण्याची गरज आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg