banner 728x90

मुंबई परिसरात ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे; शिंदेंचे निर्देश

banner 468x60

Share This:

पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

नालेसफाई सोबतच होल्डींग पाँड, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण जाळी बसवणे, होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत, असे निर्देश देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी टीम म्हणून काम करून पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (15 जून) सांगितले. दरम्यान, मुंबईतील 2000 किमी पैकी 1700 किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून रस्ते आणि खड्डे दुरूस्तीचा 80 टक्के खर्च कमी झाल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेणारी बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून घेतली. यावेळी मुंबईच्या महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, रेल्वे, पोलिस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौसेना, एनडीआरएफ, बेस्ट विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

banner 325x300

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेसह अन्य विभागांनी केलेले नियोजन मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरणार असून अजून ज्या भागात नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही तेथे सफाईचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. पाऊस लांबल्याने यंत्रणांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. होल्डींग पाँड, फ्लड गेट कार्यरत करावे. बेस्ट, एसटी ने पर्यायी वाहतुक व्यवस्थेचे नियोजन करावे. झाड कोसळून दुर्घटना होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी महापालिकेने अदिकची दक्षता घेतली पाहिजे. रेल्वेने रेल्वे ट्रॅकखालच्या नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने करावी.

झोपडपट्टीभागाताली पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाल्यास त्या भागात जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यामध्ये औषधांचा साठा करून ठेवावा. मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच एनडीआरएफ, नौदल, वायुदल, लष्कर यांची प्रत्येकवेळी आपल्याला मदत होत असते. यांच्याशी समन्वय ठेवून आपत्ती काळात मुंबईकरांना दिलासा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मुंबई शहरात 125 पर्जन्यमापक यंत्रे असून यावर्षी जून ते सप्टेंबर याकाळात हाय टाईडचे (साडेचार मीटर) 24 दिवस आहेत. 934 ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आले असून 65 मिनी पंपींग स्टेशन आहेत. पंपींग स्टेशनच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून त्याचे संनियंत्रण केले जाणार आहे. मुंबईत 1000 आपदा मित्र, एनडीआरएफची 3 पथके, नौदलाची 9 पथके तैनात आहेत, असे अतिरीक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!