राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, इटरीज आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्व आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात आली असून ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य व सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून द्यावे. याबाबतचा फलकही आस्थापनांनी दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.
ग्राहकाने विशेष मागणी केल्यासच बाटलीबंद पाणी विक्रीसाठी देता येईल. मात्र सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध न करून देणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
याशिवाय ग्राहकांसाठी हँडवॉश, साबण, टॉवेल आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरासाठी काही महत्त्वाचे निकष निश्चित केले आहेत.
* भिंती आणि फ्लोअर टाईल्सचे असावेत
* टाईल्स धुण्यायोग्य आणि जलरोधक असाव्यात
* पुरेशी हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी
* एक्झॉस्ट सिस्टीम अनिवार्य असावी
* कच्चा माल आणि तयार अन्नासाठी स्वतंत्र विभाग असावेत
* शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवावे
* इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत
* नियमित पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक
* झुरळे, उंदीर, पाल किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव नसावा
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, अलीकडील तपासण्यांमध्ये अनेक आस्थापनांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. अस्वच्छ वातावरणात अन्न तयार करणे, वारंवार वापरलेल्या तेलात पदार्थ बनवणे, निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन अशा बाबी निदर्शनास आल्या आहेत.
त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2011 अंतर्गत नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून दोषी आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
“राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित अन्न मिळणे हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या कोणालाही वाचवले जाणार नाही,” असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी कथित लॉबिंग होत असल्याचा आरोप केला होता. याबाबत विचारले असता मुंढे यांनी, “मला या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg