साखरेचे वाढते दर (Sugar Prices) पाहता तर प्रत्येक साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनामागे ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यायला हवा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे.
आधीची साखर कमी दराने विकली असली तरी शिल्लक साखरेला मिळणारा दर पाहता ४०० ते ५०० रुपये ऊस उत्पादकांना देण्यास अडचण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अचानक साखरेच्या दराने घेतलेली उसळी, कुठेतरी संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी साखरेच्या बाजारात २० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकूण पीक-पाणी पाहता पुढील हंगामात देशाला पुरेल इतके साखरेचे उत्पादन होणार आहे, हे स्पष्ट आहे. सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला असला तरी ऑक्टोबरच्या आधी बाहेरच्या देशातून साखर काही येऊ शकत नाही, असाही दावा त्यांनी केला.
कारखान्यांतील शिल्लक साठा पाहिला तर अगदी दिवाळी होऊनसुद्धा आपल्याला पुरेशी साखर शिल्लक राहील. असे असताना साखरेच्या दराने संशयास्पद उसळी घेणे, यात कुठेतरी पाणी मुरतंय असे दिसते. मी शेतकरी नेता आहे. साखरेच्या दरात वाढ झाल्याचा मलाही आनंद झाला. परंतु लगेच साखर कारखानदारांनी आधीच आम्ही साखर विकून टाकली असून, आमच्याकडे फार साखर शिल्लक राहिलेली नाही, असा कांगावा करण्यास सुरुवात केली आहे. याचाच अर्थ असा होतो की साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांत वाढवायचे असे आधीच ठरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी दरात साखर विकत घेऊन तिथेच साखर कारखानदारांच्या गोदामात ठेवली आहे, असे आरोप शेट्टी यांनी केला.
आता बाजारात येणारी साखर किरकोळ साखर कारखान्यांची असणार आहे. व्यापाऱ्यांची तसेच रिकव्हरी चोरुन रेकॉर्डमध्ये नसलेली साखर बाजारात येणार आहे. त्याच साखरेला चढ्या दराचा फायदा होणार आहे. म्हणजे हे पैसे रिकव्हरी चोरून काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदारांच्या, व्यापाऱ्यांच्या घशात जातील, अशी टीकाही त्यांनी केली.
यामुळे सरकारने प्रत्येक साखर कारखान्याकडे किती साखर साठा शिल्लक आहे? याची माहिती घ्यावी. अचानक धाडी टाकून कारखाने सांगतात तेवढी साखर शिल्लक आहे की जास्त आहे? हे पाहायला हवे. आता साखरेची वाहतूक तपासली पाहिजे. त्यांच्याकडे पावत्या आहेत का? कुठेतरी २० ते २२ हजार कोटींचा संपूर्ण देशामध्ये साखरेच्या काळाबाजारामध्ये व्यवहार होण्याचा संशय आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
सणासुदीचा काळात देशांतर्गत पुरवठा सुरळीत व्हावा आणि साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी दिली आहे.
साखरेच्या ‘एमएसपी’वर केंद्रानं निर्णय घेतला नाही- सतेज पाटील
साखर दरवाढीवर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढला पाहिजे, ही साखर कारखानदारांची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. केंद्र सरकारने याप्रश्नी पंधरा दिवसांत निर्णय घेतो म्हणून सांगितले होते. पण त्यांनी निर्णय घेतला नाही. म्हणून त्याचा परिणाम आज बाजारात दिसून येत आहे,” असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg