एल-निनो’च्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून हंगामात पावसात मोठी तूट आहे. कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाची चिंता वाढली असतानाच, भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) तीन मोठी चक्रीवादळे तयार होण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळापेक्षा मोठा तडाखा बसण्याची शक्यताही ‘इस्रो’ने वर्तविली आहे.
‘इस्रो’च्या अंदाजानुसार, मॉन्सूनोत्तर हंगामात उत्तर हिंद महासागरात तीन चक्रीवादळे तयार होऊ शकतात. उच्च वेग तीव्रता निर्देशांकांनुसार (पीडीआय) या चक्रीवादळांमधून निर्माण होणारी एकूण ऊर्जा ही प्रचंड असण्याचा अंदाज आहे.
या चक्रीवादळाचा हंगाम ४४ वर्षांच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा तब्बल ८३ टक्क्यांपर्यंत अधिक शक्तिशाली ठरू शकतो. मॉन्सूनच्या माघारीनंतर समुद्रातील वातावरण असामान्यपणे अस्थिर आणि वादळी राहण्याचे संकेत मिळत असून, मॉन्सूनोत्तर काळात चक्रीवादळे अधिक क्रियाशील राहू शकतील.
‘इस्रो’च्या संशोधकांनी ४० वर्षांतील समुद्रविषयक आणि वातावरणीय माहितीचा अभ्यास केला. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान नोंदविलेल्या जागतिक हवामानविषयक घटकांचे विश्लेषण करून वर्षाच्या अखेरीस निर्माण होणाऱ्या परिस्थितीनुसार हा अंदाज तयार केला आहे. या प्रारूपातून हंगामाची तीव्रता दर्शविण्यात आली असली, तरी चक्रीवादळ नेमके कुठे आणि कोणत्या दिवशी धडकणार, याचा अचूक अंदाज देत नाही.
उपाययोजना करण्यासाठी मिळणार वेळ
या इशाऱ्यामुळे राज्य सरकारे आणि किनारपट्टी प्रशासनाला आवश्यक तयारीसाठी महत्त्वाचा वेळ मिळणार आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा मजबूत करणे, समुद्री मालमत्ता, नागरिकांचे संरक्षण, समुद्री क्षेत्रांमध्ये मासेमारीवर बंदी लागू करणे यासारख्या उपाययोजना करता येणार असल्याचे ‘इस्रो’ने म्हटले आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg