banner 728x90

मुंबईत 82 इमारती अत्यंत धोकादायक; म्हाडाने केले जाहीर

banner 468x60

Share This:

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) आपल्या पावसाळ्यापूर्वीच्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये शहरातील ८२ सेस इमारतींना अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केले असून, त्यातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गृहनिर्माण प्राधिकरणाने म्हटले की, हे सर्वेक्षण प्राधिकरणाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाद्वारे करण्यात आले. या यादीमध्ये अशा ४३ इमारतींचा समावेश आहे, ज्यांना गेल्या वर्षीही अत्यंत धोकादायक म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते.

प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या ८२ इमारतींमध्ये एकूण २,७३६ रहिवासी वास्तव्यास आहेत. यामध्ये २,२५६ निवासी आणि ४८० अनिवासी भाडेकरू व रहिवाशांचा समावेश आहे. १७६ निवासी भाडेकरूंना इमारती रिकाम्या करण्याबाबतच्या नोटिसा यापूर्वीच बजावण्यात आल्या आहेत. यापैकी २९ भाडेकरू प्राधिकरणाच्या संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत, तर ३६ भाडेकरूंनी स्वतःहून पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे.

या इमारतींमधील उर्वरित भाडेकरू/रहिवाशांनाही स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या जात असून, इमारती  रिकाम्या करण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले आहे. उर्वरित २,१०२ रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरांमध्ये निवासाची व्यवस्था करावी लागणार असून, मंडळाने त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली असल्याचे म्हटले आहे.

प्राधिकरणाने या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना आवाहन केले आहे की, स्थलांतर मोहिमेदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच, पावसाळ्याच्या काळात संभाव्य अपघात आणि जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

जुन्या इमारतींमध्ये संरचनेशी संबंधित कोणताही दोष किंवा अपघाताची चिन्हे दिसून आल्यास, त्याची माहिती तात्काळ प्राधिकरणास कळवावी, असे आवाहनही रहिवाशांना करण्यात आले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!