राज्यात अन्नातील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली खासगी शाळांमधील उपहारगृह, कँटीन आणि मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी नुकतीच मुंबईत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शाळांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अन्न तयार करताना आवश्यक नियम पाळावेत आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
एफडीएचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगारवाड यांनी अन्न सुरक्षा अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा किंवा भोजन पुरवठादारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मागील काही वर्षांत मध्यान्ह भोजनात निकृष्ट दर्जाचे अन्न, अळ्या आणि इतर दूषित घटक आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच अनेक शाळांच्या कँटीनमधील अस्वच्छतेबाबतही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ या ऊर्जा पेयाच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेत उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यानंतर एफडीएने अन्नसुरक्षेची मोहीम अधिक वेगाने सुरू केली आहे.
नागरिकांना कुठेही अन्नभेसळ किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg