वाढत्या डिझेल दरांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. सध्या बससेवांसाठी लागू करण्यात आलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून वाढीव भाडेदर आता १५ जुलै मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहेत.
उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर महसूलवाढीसाठी १५ एप्रिलपासून लागू करण्यात आलेली ही भाडेवाढ १५ जूनला संपणार होती. मात्र, डिझेलच्या वाढत्या किंमती, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ आणि महामंडळावरील आर्थिक ताण लक्षात घेऊन वाढीव दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे साधी आणि मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर ११.०५ रुपये राहणार असून प्रौढांसाठी किमान भाडे १४ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये कायम राहणार आहे.
डिझेल दरवाढीचा मोठा फटका
एसटी महामंडळाला दररोज सुमारे १०.८७ लाख लिटर डिझेल लागते. राज्यातील डिझेलचा दर सध्या ९७.८३ ते ९९.५० रुपये प्रति लिटर दरम्यान असून त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी महामंडळाला दररोज ३३ लाख रुपयांहून अधिक अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. हा आर्थिक भार महिन्याला १० कोटी रुपये तर वर्षभरात तब्बल १२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
एप्रिलमध्येच ७६ कोटींचा तोटा
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला एप्रिल २०२६ महिन्यात सुमारे ७६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे महसूल आणि खर्च यातील तफावत अधिक वाढत असल्याने भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांवर आर्थिक भार कायम
महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सामान्य प्रवाशांना आता वाढीव एसटी भाड्याचा भार आणखी एक महिना सोसावा लागणार आहे. राज्यभरातील लाखो प्रवासी दररोज एसटीवर अवलंबून असल्याने या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. महामंडळाच्या आर्थिक स्थितीला दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ”परिवर्तनशील भाडे” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात १० टक्के प्रवासी तिकीट दरवाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यात प्रवाशांना १२ रुपये मोजावे लागतील. ही भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लागू राहणार असून या कालावधीत साध्या बससेवांसाठी प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात बससेवांवर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवणे आणि सेवा सुरळीत ठेवणे यासाठी परिवर्तनशील भाडे लागू केली आहे. या योजनेअंतर्गत, बसच्या प्रवासी मागणी आणि मार्गानुसार भाड्यात वाढ केली जाणार आहे. मात्र, मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासधारकांना या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे. तसेच, काही विशेष योजना व सवलती यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg