महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आत्तापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी नऊ हजार कोटी मिळाले आहेत. ३० लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत गतीने काम करत पाच लाख बेघरांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द करत आहोत.
पुढील वर्षी १५ लाख लोकांना किल्ल्या सुपूर्द करू. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
पाच लाख घरांचं काम पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ३० लाख घरे मंजूर केली आहेत. त्यातील पाच लाख घरे पूर्ण झाली असून याचा लोकार्पण सोहळा व महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडला. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राला १३ लाख घरे मिळाली. परंतु गेल्या वर्षी केंद्र शासनाने राज्यासाठी ३० लाख घरांचे उद्दिष्ट दिले. यामुळे सव्वा कोटी लोकांना त्यांच्या डोक्यावर पक्के छत मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घर मिळणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला कायम मोफत वीज देण्यासाठी सौरऊर्जेसाठी अनुदान देण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांना स्वत:ची जागा नाही त्यांना घर बांधण्यासाठी जागा विकत घेण्यासाठी शासन एक लाख रुपयांचे अनुदान देत आहे. अनेक शासकीय जागांवरील आरक्षणे रद्द करून बेघरांना घरासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी
शेतकऱ्यांच्या विविध विषयांबाबतही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने केंद्रीय कृषीमंत्र्यांना विनंती केल्यानुसार त्यांनी १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
साखरेच्या हमीदराबाबत लवकरच बैठक
शेतकरी व शेती समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, पश्चिम आशियातील व बांगलादेशातील संकटामुळे कांद्याचे भाव पडले होते. साखरेच्या हमीभावासंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg