छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २९ मे रोजी देशात आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले.
त्यापैकी ४,७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला.
मे महिन्यात दाखल अर्जांमध्ये ४ लाख ४९ हजार अर्जांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात ३ लाख, उत्तर प्रदेश १ लाख, राजस्थान ४४ हजार व केरळ ३५ हजार या राज्यांचा महाराष्ट्रानंतर क्रमांक लागतो.
छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात महाराष्ट्र ५४ हजार प्रकल्पांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याबाबतीत उत्तर प्रदेश ६४ हजार, गुजरात ३५ हजार, राजस्थान २६ हजार व केरळ २० हजार ही अन्य राज्ये टॉप पाच राज्यांमध्ये आहेत. छतावर बसविलेले सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प तपासण्याच्या बाबतीही महाराष्ट्र ६९ हजार प्रकल्पांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
तीन टप्पे
१) वीज ग्राहकांकडून अर्जांची स्वीकृती
२) प्रत्यक्ष प्रकल्प बसविणे
३) तपासणी करून तो सुरू करणे
भरघोस अनुदानामुळे लाभ
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरगुती वीज ग्राहकांना घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी थेट अनुदान मिळते.
किती मिळते अनुदान?
एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये
दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये
तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये
कंत्राटदारांच्या नोंदणीमध्ये पाच राज्ये आघाडीवर
छतावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्याचे काम नोंदणीकृत कंत्राटदारांमार्फत केले जाते. ग्राहकाला पसंतीप्रमाणे कंत्राटदार निवडता येतो. कंत्राटदारांच्या नोंदणीमध्ये ४१३ कंत्राटदारांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश ७७९, गुजरात २१०, आसाम १८१ व राजस्थान १७७ ही सर्वोच्च कामगिरीच्या पाचपैकी अन्य राज्ये आहेत.
राज्याची कामगिरी कशी सरस?
मे महिन्यात योजनेसाठी सादर अर्जांमध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसविलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक अशा रीतीने या योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या पाच टॉपर राज्यांमध्ये समाविष्ट झाला आहे.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg