अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्तीपदी नियुक्ती झाल्यापासून धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर कामांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे.
त्यामुळे राज्यभरातील खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक, औषध विक्रेते, कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या या धडाक्यानंतर त्यांची बदलीचीही चर्चा सुरू झाली. पण अनेक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत.
तुकाराम मुंढे यांची एका पदावर फारकाळ राहत नाही. सरकारकडून काही महिन्यांत किंवा एक-दीड वर्षातच दुसऱ्या पदावर बदली केली जाते. मंगळवारीही मुंढे यांच्या एका पदावरील नियुक्तीतील बदलाचा आदेश आला. ते अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी कायम राहणार असले तरी परभणी जिल्हाच्या पालक सचिव पदावरून त्यांना हटविण्यात आले आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून मंगळवारी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंढे यांची २३ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ते दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव होते. मागील महिन्यातच त्यांची एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर महिनाभराने त्यांची पालक सचिव पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
कोण आहे दोन नवे पालक सचिव?
सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी महिन्यातील नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल केला आहे. या बदलानुसार मुंढे यांच्या जागी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची परभणीच्या पालक सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे अकोल्याचे पालक सचिवही बदलण्यात आले आहे. सौरभ विजय यांच्या जागी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालक सचिव का महत्वाचे?
पालक सचिव पद हे महत्वाचे मानले जाते. शासनाचे धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजना यांची क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. यासाठी त्यांना संबंधित जिल्ह्यात 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 4 वेळा जिल्ह्यात दौरा करणे आवश्यक असते. शासनाच्या योजनांचा आढावा घेणे, त्याचा अहवाल सादर करणे, अडचणींवर उपाय सुचविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg